Wednesday, May 29, 2019

स्तोत्रपठणाचं महत्त्व

ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.

आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.

पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.

कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.

डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.

ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ 'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.

आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.

संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?

आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.

ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.

तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.

आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.

शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल.

Tuesday, May 28, 2019

‘ईगो’ (Ego) म्हणजे नक्की काय?


एकदा एक कावळा आपल्या पंजात मांसाचा एक भला मोठ्ठा तुकडा घेऊन उडत चालला होता.
.
त्याचा विचार होता की एखाद्या शांत जागी उतरावे आणि तो मांसाचा तुकडा शांतपणे गट्ट करावा. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की काही गिधाडे त्याच्या मागे लागली आहेत.
.
ती गिधाडे बघुन तो कावळा घाबरला. त्याला वाटले की ती गिधाडे त्याला मारण्यासाठीच त्याच्या मागे लागली आहेत.
.
त्या गिधाडांच्या तावडीतुन सुटण्यासाठी तो कावळा आणखी जोरात आणि आणखी उंचीवरून उडायचा प्रयत्न करू लागला. पण त्याने त्याच्या पंजात धरलेल्या मांसाच्या जड तुकड्यामुळे हे काही शक्य होईना.
.
कावळ्याची चांगलीच दमछाक झाली. त्याला काही फार उंचावरून उडता येईना. एक गरूड ही गंमत बघत होता.
.
शेवटी तो गरूड पक्षी उडत कावळ्याजवळ आला आणि म्हणाला, ‘का रे बाबा! काय भानगड आहे? तु एवढा घामाघुम का झाला आहेस?’
तो कावळा म्हणाला, ‘ हे गरूडा! ही गिधाडे केव्हापासुन माझ्या मागे लागली आहेत. ती माझ्या जिवावर टपली आहेत. त्यांच्यापासुन बचाव करण्यासाठी मी अजुन उंचावरून उडायचा प्रयत्न करतो आहे.’
.
कावळ्याचे हे बोलणे ऐकुन तो गरूड म्हणाला, ‘ अरे ती गिधाडे तुझ्यामागे नाहीत, तर तुझ्या पंजात असलेल्या मांसाच्या तुकड्यासाठी तुझ्या मागे लागली आहेत.
.
तो तुकडा जड असल्यामुळे तुला फारसे उंचावरून उडता पण येत नाही. फेकुन दे तो मांसाचा तुकडा आणि बघ काय होते ते!’
.
कावळ्याने त्याप्रमाणे केले. त्याने तो मांसाचा तुकडा आपल्या पंजामधुन सोडुन दिला. मागे लागलेली सगळी गिधाडे त्या मांसाच्या तुकड्याकडे गेली.
.
मांसाच्या तुकड्याचे ओझे गेल्याने त्या कावळ्याला पण हलके वाटले आणि त्याने उंच भरारी घेतली....

आपण सगळेजण कावळेच आहोत आणि असाच एक जड तुकडा आयुष्यभर आपल्या डोक्यात ठेवून आपण जगत असतो. या तुकड्याचे नाव आहे ‘ईगो’ (Ego) म्हणजेच ‘मी’ पणा किंवा स्वतःविषयीच्या काही भ्रामक कल्पना..!

आपण कोणीतरी खास आहोत, आपण फार हुषार किंवा बुद्धीमान आहोत, आपल्याला सगळे काही कळते किंवा समजते, आपण दादा आहोत, आपल्याकडे भरपूर शिक्षण किंवा संपत्ती आहे अशा प्रकारचे भ्रम अनेकांना झालेले असतात. आपली इज्जत, आपली प्रतिष्ठा, घराण्याची अब्रु अशा नावाखाली अनेक जण या भ्रामक कल्पना प्राणपणाने जपत असतात. आपला ईगो कुरवाळत असतात.
मग या साठी शत्रुत्व आले तरी चालते, माणसे तुटली तरी चालतात,

पण ज्यांना ‘ईगो’ नावाचा अवजड तुकडा सोडणे जमते तेच उंच भरारी घेऊ शकतात.

एकदा तरी आपला ईगो बाजुला ठेवा.. विसरा..सोडून द्या..
बघा काय चमत्कार होतो ते..!

🙏🙏🙏 संकलन 🙏🙏

Thursday, May 9, 2019

श्रीमंत

मला नेहमी असं वाटायचं की च्यायला जाम पैसा आला म्हणजे मनुष्य श्रीमंत होतो...

नंतर नंतर माझ्या लक्षात आलं पैसा आला की तो "पैसेवाला" नक्की होतो पण "श्रीमंत" होतोच असं नाहीये...

श्रीमंत या शब्दाची व्याख्या खुप मोठी आहे. वेदांमध्ये जी "श्री" नावाची देवता आहे ती लक्ष्मीपेक्षा थोडी निराळी आहे...

श्री या संज्ञेत पैसा,यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार, प्रतिष्ठा, उद्योगशीलता, सुस्वभावीपणा वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्यात अनुस्युत आहेत...

फक्त पैसा नव्हे. हे लक्षात आल्यावर मी आसपासच्या काही मंडळींचं निरिक्षण केलं आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरंच यार पैसेवाला आणि श्रीमंत या दोन अत्यंत निरनिराळ्या कन्सेप्ट्स आहेत...

गंमत म्हणजे प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला होताच पण प्रत्येक पैसेवाला हा श्रीमंत नव्हता...

अनेक पैसेवाले असे आहेत की ज्यांना पैशाची "फिकीर नाही"...

अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचं वळण न लावल्यामुळे तो पैसा घरात लाथेलोटेसारखा असला तरी त्याला नियोजन नाही...

बेफिकीरी, व्यसनाधिनता, उधळपट्टी, वागणूकीत अहंकार, बेशिस्त अनेक पैसेवाल्यांकडे पदोपदी दिसली मला...

सगळीकडे झगमगाट होता पण त्या झगमगाटामागे दिखावा आणि माज होता...

"मी किती महागाची स्कॉच पितो बघ" हे सांगण्यामागे ब्रॅन्डच्या कौतुकापेक्षा, पैशाच्या लेबलला जास्त व्हॅल्यु होती...

ही खरेदी आणि बेफिकीरी घरातल्या इंटॆरिअरपासुन लहानशा खरेदीपर्यंत जिथेतिथे दिसते...

सुसंस्कृतपणा खुप कमी पैशेवाल्यांकडे आहे.
मुलं काय शिकतायत? यापेक्षा सगळ्यात भारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलंय याचंच वारेमाप कौतुक...

वाचनसंस्कृती, अभ्यासूपणा, विचारशीलता, सुसंस्कृतपणा याचा जिथेतिथे अभाव दिसत होता...

पण याउलट माझ्या परिचयातील कित्येक श्रीमंत मंडळी ही खुपच निराळी आहेत.

कुणाकडे स्वच्छतेची प्रचंड आवड तर कुणाकडे नेटकं आणि सुबक इंटेरिअर (अजिबात झकपक नाही),
कुणाला पुस्तकांचं कलेक्शन करुन त्याची सुबक लायब्ररी करण्याचा छंद तर कुणाला Antic मूर्त्या आणि चित्रं जमवायचा छंद...

कुणाला समाजसेवेची आवड तर कुणाला शेतीची हौस.
आणि गंमत म्हणजे सर्व श्रीमंत हे अतिशय Down to earth आणि सुसंस्कृत विचारांचे आहेत...

प्रत्येकाने संपत्तीचं उत्तम, Long Term नियोजन केलेलं आहे. रितसर कागदपत्रे, त्यांच्या फायली तयार आहेत. सरकारी करांचा भरणा व्यवस्थित केलेला असतो. कुठेही कसलाही Show Off नाही आणि बडेजाव तर त्याहून नाही...

स्वत: केलेल्या समाजसेवेचं कौतुक तर अजिबात नाही.

कोट्याधीशाकडच्या पार्ट्यांसोबत गरीबाकडच्या सत्यनारायणालाही आवर्जुन जातात..
कुठेही कसलाही भेदभाव नाही, Attitude तर औषधालाही नाही...

उत्तम मोजकं आणि छान खाणं, भरपूर व्यायाम, सौंदर्याची निगा, मोजके पण सिलेक्टेड दागिने, अदबशीर बोलणं, वागणं... म्हणजे वेदातल्या "श्री" या संकल्पनेला अनुरुप असं परिपूर्ण श्रीमंत व्यक्तिमत्व ते हेच हो...

आणि मग माझ्या लक्षात आलं की एकतर भरपूर मेहनत करुन, कष्ट करुन, उद्योग करुन किंवा मग लांड्यालबाड्या करुन, जमिनी विकून "पैसेवाला" होता येणं कुणालाही सहज शक्य आहे पण "श्रीमंत" होणं हे एक कष्टसाध्य पण छान व सुंदर "मिशन" आहे...

पैसेवाल्यांना श्रीमंत होणं अशक्य आहे असं मी अजिबात म्हणणार नाही.

तो एक प्रवास आहे, विचारपुर्वक करण्याचा...
तो करायलाच हवा.
तुमचं पैसेवालं असणं हे सगळ्यांच्या दृष्टीने जितकं हास्यास्पद आहे तितकंच श्रीमंत होणं कौतुकास्पद आहे हे लक्षात घ्या...

आपण खुप श्रीमंत  व्हावे ही ईश्वरचरणी प्रार्थना...!!

             पिंपळाच्या रोपासारखं ...
             खडकावर उगवता आलं पाहिजे,
             निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर
             चालता आलं पाहिजे.
             वादळांचं काय....
             ती येतात आणि जातात,
             मातीत घट्ट पाय रोवून
             उभं रहाता आलं पाहिजे.

आपण असे "श्रीमंत" व्हावे हीच मनोकामना ! 🙏

निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ||