Saturday, July 25, 2020

!!! दैवी जीवनाचे १८ नियम !!!

देह सोपवावा प्रारब्धावर।
मन गुतंवावे सद्गुरू चरणावर!!
             
शांत, समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात.

हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे तंतोतंत पालन व्हावे लागते. हे अठरा नियम रक्तात व आचरणात भिनले असता ईश्वरी कृपेचा वर्षाव होतो .

१) सतत श्वाच्छोश्वासांवर लक्ष ठेवावे व मनातल्या मनात परमेश्वराचे नामस्मरण करावे. योग्य वेळ येताच कोणीतरी पुढील मार्ग दाखविणारा भेटतो. ही योग्य वेळ येईपर्यंत सोऽहम् साधना, नामस्मरण, स्तोत्रपठण व एकाग्र चित्ताने करण्याचा प्रयत्न करावा.

२) सतत दान करत राहावे. दानाने संपत्ती वाढते. दानाने पाप फिटते. दानाने शांती समाधान प्राप्त होते. दानाने अध्यात्मात प्रगती होते.

३) प्राप्त परिस्थितीत समाधानात राहण्यास शिकावे. समाधानात राहण्याची कला साध्य झाली असता कठीण परिस्थितीवर मात करता येते.

४) पूर्वजन्मातील कर्मानुसार सुख, दुःख, लाभ, हानी, जय, अपजय, आरोग्य, अनारोग्य, यश, अपयश या गोष्टी प्राप्त होत असतात. दान व ईश्वरभक्ती या दोन गोष्टींनी यातील नकारात्मक गोष्टींवर विजय प्राप्त करता येतो. म्हणजे दु:ख, हानी, अपयश व अनारोग्य इत्यादी गोष्टींवर विजय मिळविता येतो. यासाठी सतत सत्कर्म करत राहावे.

५) स्वत: आनंदात राहावे, इतरांना आनंद देत राहावे, इतरांच्या उपयोगी पडत राहावे. तुमचा प्रत्येक परोपकार ईश्वराकडे नोंद होत असतो व आपल्याला आनंद प्राप्त होत असतो.

६) आहार, निद्रा, भय व मैथुन या गोष्टी प्राणीही करतात. त्यांचेही कुटुंब असते. समूह जीवन असते व त्यांनाही चिंता, काळजी असतात. मनुष्यात व प्राण्यात फरक इतकाच की मनुष्य परोपकार, दान व ईश्वरभक्ती करून परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश प्राप्त करू शकतो. हे भाग्य प्राण्यांना प्राप्त होत नाही. परंतु पूर्वजन्मातील सत्कर्मामुळे जे प्राणी सत्पुरुषांच्या सहवासात राहतात, त्या प्राण्यांना मरणोपरांत मनुष्य जन्म प्राप्त होतो.

७) नि:स्वार्थ असणे, परोपकारी असणे, प्रेमळ असणे हे ईश्वरीकृपेचे लक्षण समजावे.
 
८) सर्व येथे राहणार | काही न येई बरोबर ||
सत्कर्म आणि सदाचार | हेचि जीवाचे सांगाती ||
शाश्वत आणि अशाश्वत गोष्टी समजण्याचा प्रयत्न करावा.

९) एकाच आसनावर स्थिर बसून श्वासावर लक्ष ठेवून दररोज थोडावेळ ध्यान करावे. हळूहळू वेळ वाढवत जावे. तीन तासापर्यंत अशाप्रकारे ईश्वर चिंतन जमले की साधक ही अवस्था प्राप्त होते.

१०) मन निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा. कसलाही विचार न करता बराच वेळ राहता आले, की प्रकाश ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मनात कुठलीही कल्पना अथवा विचार उठू देऊ नये. हे व्यवस्थितरीत्या जमू लागले, की सिद्ध साधक अशी अवस्था प्राप्त होते.

११) खूप खोल व दीर्घ श्वास घ्यावा व सावकाश सोडावा. असे बराच वेळ करत बसावे. असे केल्याने मन निर्विचार होऊ लागते. मन एकाग्र होते व हळूहळू निर्विकल्प समाधी लागू होते जर भाग्य खूपच अपवित्र असेल तर शुद्धिकरणासाठी सद्गुरू सेवा करणे आवश्यक आहे. 
अध्यात्मात प्रगती होऊ देणे व प्रगती होऊ नये म्हणून आपलेच प्रारब्ध अशा प्रकारचे खेळ खेळत असते. प्रारब्धाच्या या प्रकारावर लक्ष ठेवून ह्यावर मात करण्यासाठी सद्गुरू ची नियमित सेवा करावी लागते. तसेच सिद्धपुरुषांच्या कृपेने विहंगम मार्ग प्राप्त होतो व निर्विकल्प समाधी लागते. गुरु अथवा सिद्धपुरुषाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. जेव्हा शिष्याची तयारी होते तेव्हा गुरु आपोआप भेटत असतो. म्हणून सद्गुणांची कास धरा म्हणजे सिद्धपुरुषांनी कृपा करावी एवढी पात्रता येईल व निर्विकल्प समाधीचा मार्ग सापडेल. पुष्कळ वेळा असेही घडते की एखादा करुणासागर सिद्धपुरुष भक्तांना आपणहून भेटतो. परंतु भक्तांची पूर्वकर्मे जर दूषित असतील किंवा घराण्याचे प्रारब्ध जर खूपच अशुद्ध असेल तर ते अशुद्ध प्रारब्ध सत्पुरुषाची सेवा करू देत नाही किंवा सतपुरुषाबरोबर अहंकाराने वागण्याची दुर्बुद्धी देते व शेकडो जन्मानंतर आलेली संधी भक्त गमावतो. एकदा का अशी संधी गमावली की पुढचे शेकडो जन्म ईश्वराचे फटके खाण्यात जातात.
 
१२) सिद्धपुरुषा बरोबर आत एक व बाहेर एक असे कधीही वागू नये असे वागल्याने वातावरणातील देव-देवता नाराज होतात. देव - देवता अशा भक्तांची साथ सोडून देतात. वातावरणातील दुष्ट शक्ती अशा भक्तांच्या मन, बुद्धीवर ताबा मिळवितात. मग या भक्ताच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की त्याची सर्व पुण्याई नष्ट होऊन जाते. त्याला काहीही चांगले दिसत नाही. सर्वत्र दोष, दुर्गुण त्याला दिसू लागतात. पराकोटीच्या सज्जनां मध्ये सुद्धा त्याला दोष दिसू लागतात. त्यांना नावे ठेवण्यात त्याला आसुरी आनंद प्राप्त होतो. अशी माणसे मग सत्पुरुषांबरोबर व सज्जनांबरोबर आत एक व बाहेर एक अशा पद्धतीने वागू लागतात व खूप कष्टाने मिळवलेली पुण्याई नष्ट करतात. यावरून एक गोष्ट लक्षात येईल, की मनाचा सरळपणा हा एक अत्यंत बहुमूल्य सद्गुण असून, हा सद्गुण ज्याच्याकडे आहे अशी माणसे अत्यंत सात्त्विक व खूप पुण्यवान असतात.

१३) मनुष्य जन्म म्हणजे ईश्वरप्राप्तीचे प्रवेशद्वार असून, या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा मानवाने प्रयत्न करावयास हवा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास हवी.
 
१४) सद्गुणांनी मनुष्य देव बनतो. देवाला बाहेर शोधू नका. सद्गुणांची कास धरा आणि सत्कर्म करा देव तुमच्या हृदयात येऊन राहील.

१५) अनुलोम वीलोम प्राणायाम करा, या प्राणायामाने शरीर व मन शुद्ध होण्यास मदत होते. आहार सात्त्विक हलका व पचेल असा असावा. अमली पदार्थांचे सेवन नये. दया, क्षमा, शांती, करुणा, अहिंसा, प्रेम, ईश्वरभक्ती या सद्गुणांनी मानव महामानव बनतो. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठीच ईश्वराने आत्म्याला मानवाचा जन्म दिलेला असतो.
 
१७) पृथ्वी हे एक विश्वविद्यालय असून मानवता शिकण्यासाठी विविध योनीतील आत्म्यांना ईश्वर मानवरूपामध्ये जन्म देतो व पृथ्वीवर शिकण्यासाठी पाठवितो. येथे जे शिकत नाहीत त्यांना भयंकर शिक्षांना तोंड द्यावे लागते. येथे जे अहंकाराने वागतात, स्वार्थाने वागतात, दुष्टपणा करतात अशा सर्वांना खूप कडक शिक्षा होत असतात.
 
१८) सत्ता, संपत्ती व प्रसिद्धी यांच्या मागे माणसे धावत असतात. परंतु याच गोष्टी अशांती, अस्थिरता व भिती निर्माण करतात. या गोष्टी मानवाला ईश्वरापासून दूर नेतात. माणसाने थोडे दूर रहावे. यांच्या मागून धावून मागून धावणारी माणसे  स्वत:चे इतके नुकसान करतात हजारो वर्षांनंतरसुद्धा हे नुकसान भरून येत नाही. 

वरील अठरा नियमांचे जे लोक श्रद्धेने पालन करतील ते इहलोकी व परलोकी सुखी होतील.

तर हे आहेत ते अठरा नियम. वाचा त्यावर विचार करा. पटले तर स्वीकार करा. जसे मी तुम्हांला सांगितले तसे तुम्ही सुद्धा इतरांना सांगा.

|| शुभं भवतु ||

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. 

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन.

दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. 


जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?


जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. 

म्हणजेच...
 
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. 

म्हणजेच... 

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. 

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका -

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. 

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती -

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. 

बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. 

बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. 

म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. 

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना ...

म्हणजेच जिवती पुजन 

जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

-------

(फेसबुक पेज वरून साभार)