Monday, May 4, 2020

दुस-याचा विचार

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने दो-याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा, दुस-याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.

पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे, एकत्र कुटुंब असायचं, गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं अंघोळीला जाण्यापुर्वी दुस-यासाठी बंबात पाणी भरायचं, दुस-यानं तिस-या साठी, जेणेकरुन वेळ आणि इंधनबचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.

सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली, आता दुस-याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.

आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं (नीट पुरवणी आत ठेऊन) निश्चित जागी ठेवला तर दुस-याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो, शोधाशोध करावी लागत नाही.

पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीजमधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.

बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं, ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.

पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून/घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.

खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा  कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे, आपली टर्न आल्यावर संपल्या/ बिघडल्या तर आठवणीने आणणे. ही काळजी घेणे.

घर सगळयांचं असतं, सगळी जवाबदारी गृहिणीची असं म्हणून जवाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो, चुकीच्या सवयी लागतात.

घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा, हे एक लहानसं युनिट समजा, देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही.(खरंतर हाॅटेलचेसुध्दा नियम असतातच!)

लाॅकडाऊनचा काळ ही एक संधी आहे घराला घरपण देण्याची, सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात फायदा होईलच आणि नातीसुध्दा चांगली होतील. थोडं थांबून आपल्या नंतर येणा-याचा विचार केला तर ही मदतीची साखळी सुरु राहील मुख्य म्हणजे आपली वेळ येईल तेव्हा आपल्यालाही फायदे मिळतील.

©कांचन दीक्षित

‘ऋषी’ आणि ‘मुनी’ : नेमका फरक काय? जाणून घ्या.

ह्या ऋषि मुनींकडे प्रमुख पात्र विद्यार्जनासाठी जात असतात. अनेकदा आपल्याला ऋषी आणि मुनी हे एकच असतात असं वाटतं. पण धर्मशास्त्राच्या आधारावर बघायला गेलं तर ऋषी आणि मुनी ह्या दोघांमध्ये फरक आहे. तो फरक काय आहे ते आपण जाणून घेऊया.

धर्मशास्त्रानुसार मुनी म्हणजे तो व्यक्ती जो सदैव स्वतःचा शोध घेत असतो आणि आपला बहुतांश वेळा विचार करण्यात घालवत असतो. मुनी ही विचारवंत आणि तत्वज्ञाला प्रदान करण्यात आलेली उपाधी आहे. ते निसर्गाच्या संबंधातील उत्कट मानवी धाग्यांचा शोध घेत असतात. त्यांना ज्ञानाच्या कसोटीवर उच्च स्थान प्राप्त असते. त्यांनी अनंत काळ तपश्चर्या आणि साधनेच्या माध्यमातून ज्ञानार्जन केलेले असते.

वेद हे ज्ञानाचा अगम्य असा स्रोत असून वेद म्हणजेच ज्ञान असा अर्थ पुर्वापार सांगण्यात आला आहे. संस्कृतमध्ये विद- अर्थात काही जाणून घेण्याची महत्वकांक्षा ह्या शब्दापासून वेद ह्या शब्दाची निर्मिती झाली आहे.

वेद हे अजस्त्र ज्ञानाचा स्रोत असून त्यात असंख्य ऋषी व मुनींचा उल्लेख आढळून येतो. परंतु वेद ज्यांच्या ध्यानी मनी नाही अशा लोकांना ऋषी व मुनी यांच्यातील फरक लक्षात येत नसतो. ऋषी मुनी कोण आहेत आणि त्यांच्यातील फरक काय, हे जाणून घेणे रोचक आहे.

खरंतर ऋषी मुनी ह्या दोघांमध्ये बऱ्यापैकी समानता असते. मुनी हा ऋषी बनण्याचा एक टप्पा आहे. मुनी हा ऋषींचा एक प्रकार आहे, असं देखील नमूद करण्यात आलं आहे. मुनी हा असा मुनुष्य असतो सदैव आत्मचिंतन आणि साधनेत गुंग असतो. विश्वातील सूक्ष्म तत्वज्ञान व गूढाची उकल करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मुनींकडे सामान्य गोष्टींकडे असामान्यपणे बघण्याचा दृष्टिकोन असतो.

ऋषी मात्र एका बाजूला एक तपस्वी असतो जो अनेक सहस्त्रके तप करण्यात घालवतो व त्याला ज्ञानाच्या पातळीवर उच्च स्थान प्राप्त असते. तपश्चर्येच्या माध्यमातून ऋषींचं एकच लक्ष असतं ते म्हणजे आत्मनुभूती मिळवणे. ह्या सर्व प्रक्रियेत त्यांना त्यांच्या इष्ट देवतांकडून वरदान देखील प्राप्त होते. त्यांच्या तपस्येवर आणि त्यांच्या समर्पणावर देव प्रसन्न होत असतात.

ऋषी हे कवी असतात. शेकडो हजारो वर्षांच्या तपातून त्यांना जी ऊर्जा व ज्ञान प्राप्त होते, ते ज्ञान काव्यमय पद्धतीने समाजापर्यंत पोहचवण्याचे काम ऋषी करतात. त्यांच्या ह्या काव्य रचनांचे एकत्रिकरण वेदांमध्ये करण्यात आलेले आहे.

वेदांचा अनुसार ऋषींचे चार प्रकार पडतात:-

१) राजर्षी: तब्बल १००० वर्ष राज्यकारभार करणाऱ्या राजे आपली गडगंज संपत्ती व ऐश्वर्य याचा त्याग करून संन्यास स्वीकारून साधना व तपश्चर्येचा मार्ग स्विकारतात त्यावेळी त्यांना राजर्षी म्हणून ओळखले जाते.

२) देवर्षी: देवर्षी हे त्रिकालदर्शी असतात. त्यांना भविष्याचं संपूर्ण ज्ञान असतं व त्यांना त्रिलोकात विहार करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यांचावर आपल्या ज्ञानाचा प्रसार करण्याचे दायित्व असते. नारद मुनी हे देवर्षी म्हणून ओळखले जातात.

३) महर्षी: ही एका अत्यंत प्रतिभावान आणि ज्ञानी ऋषिला प्राप्त होणारी उपाधी आहे. ब्रम्हर्षी ह्या सर्वोच्च स्थानाच्या प्राप्तीच्या अगदी काही पावलं अंतरावर असलेल्या लोकांना ही उपाधी मिळते. महर्षी हे असंख्य सहस्त्रकं तपोसाधना केल्यानंतर प्राप्त होणारे मोठे स्थान आहे.
केवळ एका अधर्मी कृत्यामुळे व मनाचा ताबा गमवल्यामुळे महर्षी पद गणावण्याचा धोका असतो, त्यामुळे महर्षी हे फार काटेकोर नियमांचे पालन करतात. ह्यात सर्वात चांगलं उदाहरण विश्वामित्र असून आपल्या राज वैभवाचा त्याग करून तब्बल ३००० वर्ष तपश्चर्या करून त्यांनी महर्षी होण्याचा मान मिळवला होता.

४) ब्रम्हर्षी: हे ज्ञानाच्या क्षेत्रातील परमोच्च स्थान समजलं जातं. एक ऋषी म्हणून गाठायचं सर्वोच्च स्थान म्हणजे ब्रम्हऋषीपद होय. ब्रम्हर्षी हा एक असा साधू असतो ज्याने तपश्चर्या करून आपल्या आयुष्यातील परमोच्च ज्ञानाची व आध्यात्मिक शक्तीची प्राप्त केली असते. ब्रम्हर्षी हे आत्मज्ञानी असतात. वशिष्ठ व विश्वामित्र ह्या दोन रामायण कालीन ऋषींना ब्रम्हर्षी पदाची प्राप्ती झाली होती.

मुनी ही ऋषी बनण्याची पहिली पायरी असते आणि ब्रम्हर्षी पद हे सर्वोच्च ज्ञान प्राप्तीचा बिंदू असते. प्रत्येक व्यक्ती मुनी पदा पासून आत्मज्ञान प्राप्ती करून ऋषी पदांची प्राप्ती करत असतो.

(Copy Paste)