Thursday, November 8, 2018

दैव आणि कर्म


        आमच्या गल्लीत एक दुकानदार आहे.
        मी त्याच्या दुकानावर गेलो व त्याला विचारले कि बाबा रे! मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचे उत्तर देवू शकतोस का?
तो म्हणाला तुम्ही खुशाल विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन.
         मी विचारले कि माणुुस मेहनत करतो, मग त्याला यश मिळाले कि तो म्हणतो हे देवाने यश पदरात टाकले.
मला सांग दैव श्रेष्ठ कि मेहनत?
         मला वाटले कि याची पुरती बोलती बंद होणार, पण त्याने जे उत्तर दिले ते एकुन मी अवाक झालो.
      बोलती बंद त्याची नाही तर माझीच बोलती बंद झाली.
           त्याने उत्तर दिले...
तो म्हणाला, मला सांगा तुमचे बँकेत सेफ डिपॉजीट चे लॉकर आहे? त्या लॉकरला दोन चाव्या असतात.
एक तुमच्याकडे आणि एक बँक मँनेजर कडे.
लॉकर उघडतानां त्या दोन्ही चाव्या लॉकरला लावाव्या लागतात. तरच तो लॉकर उघडते अन्यथा नाही. बरोबर ना?
मी म्हणालो बरोबर, पण याचा मी विचारलेल्या प्रश्नाचा काम संबंध?
            तो म्हणाला जसे बँक लॉकरला दोन चाव्या असतात, तश्याच आपल्या मानवास नियतीने दोन चाव्या दिल्या.
एक मेहनतची चावी, ती आपल्या पाशी असते.
तर दुसरी नशीब (दैव) चावी ही त्या परमेश्वरा पाशी असते.
          आपण आपली चावी यशाच्या लॉकरला लावून द्यायची, जेव्हा परमेश्वर त्याकडची चावी यशाच्या लॉकरला लावेल, तेव्हाच आपले यशाचे लॉकर उघडेल अन्यथा नाही.
          यशा साठी मेहनत व नशीब या दोन्ही चाव्या आवश्यक आहे. त्या शिवाय यशाचे द्वार उघडणार नाही.
मानवाने मेहनत करता करता त्या परमेश्वराचे सतत नामस्मरण करत राहावे. तरच त्याला यश मिळेल, अन्यथा नाही. नुसती मेहनत करूनही उपयोग नाही व नुसती भक्ती करुन ही उपयोग नाही.
        यश मिळवण्यासाठी मेहनत व भक्ति दोन्ही आवश्यक आहे.

Friday, October 12, 2018

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?

प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत करु शकता का?

सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन, कारण तुम्ही हे मान्य केलेत, आणि तुम्ही आयुष्यात नवे सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात, सज्ज आहात, त्यामुळे अर्धा विजय तर इथेच झाला..

मी चुकतोय, हे कळणे, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणे; नाही का?

आता तुमच्या प्रश्नाकडे वळुया, मी तर म्हणेन, 'दाग' अच्छे है, च्या धर्तीवर 'राग' चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल..

उदा. आपल्याला कचऱ्याचा राग येतो, म्हणुन तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरिबीचा तिटकारा असतो म्हणुन आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणुन तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो!

राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात..

गांधीजींना जेव्हा रेल्वेतुन बाहेर फेकुन दिलं, तेव्हा त्यांना प्रचंड राग आला, इतका की त्यांनी ना ना खटपटी करुन इंग्रजांनाच देशाबाहेर हाकलुन लावलं..!

मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलुन टाकली..

नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली..

आंबेडकरांनी तेच केलं, शिवाजी महाराजांनी केलं, त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवुन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातुन मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी वापरलं!..

ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की!

फालतु गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमुल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.

जिथं राग येतो अशा परिस्थितीला हाताळण्यासाठी काही टिप्स देत आहे..

१) स्वीकार करा..
समजा, तुम्ही कॉम्पुटरवर खुप महत्वाचं काम करत आहात, आणि लाईटस गेले, आता तुम्ही चिडचिड करुन काही फायदा आहे का? शिव्या देऊन, डोकं खराब केल्याने फायदा काहीच होणार नाही, झालं तर नुकसानच होईल, म्हणुन ‘लाईट गेली’, याचा स्वीकार करा, आणि दुसरे एखादे काम शोधा, त्यात 'मग्न' व्हा!, त्याचा आनंद घ्या..!

असचं समजा, तुम्ही ट्रॅफीक जॅममध्ये अडकला आहात, मग आता किरकिर करुन कर्कश हॉर्न वाजवुन, आजुबाजुच्यांशी भांडुन काय साध्य होणारे? त्यापेक्षा कारमध्ये मस्त गाणे लावा, आणि आनंद घ्या..!

२) स्वतःला दररोज सुधारा.. सिद्ध करा..
कोणी तुमची चुक नसताना अपमान केला, फसवले किंवा भांडले तर त्यावर जास्त विचार करुन वेळ वाया घालवणं, म्हणजे मुर्खपणा आहे, नको त्या आठवणी कुरवाळत बसायचे नसते, त्या विसरायच्या असतात, पण त्यातुन कमवलेला अनुभव, मिळालेला धडा मात्र आयुष्यभर आपोआप लक्षात ठेवायचा..

३) चुप्प बसा.. विसरा..
कधी कधी आपल्याला दुखावणारे आपलेच लोक असतात, अशा लोकांना जबर प्रत्युत्तर देऊन आपणच घायाळ होतो, अशा जखमा होतात, ज्या भरण्यासाठी आयुष्य जावे लागते.. म्हणुन अशा वेळी मौन पाळणे सोयीस्कर ठरते..

आईवडील, भाऊ बहीण, बायको मुले, जिवलग मित्र, जवळचे नातेवाईक, कर्मचारी, सहकारी, भागीदार, ग्राहक यांच्याशी लढाई करुन आपण जिंकलो तरी त्या युद्धात आपलेचं लोक हरलेले असतात, आपल्या शब्दांनी रक्तबंबाळ झालेले असतात..

अशा विजयश्रीचा आनंद साजरा तरी कसा करावा?

म्हणुन काही ठिकाणी गप्प राहणं, तिथुन निघुन जाणं आणि मौन पाळणं, श्रेष्ठ असतं..!

४) आभार मानुन आनंदी व्हा!
ज्या व्यक्तिचा राग येतोय, त्याच्यात काही चांगले गुणसुद्धा आहेत, त्याने कधी तुम्हाला मदत सुद्धा केलीय, ते आठवुन त्याचे आभार माना. राग पळुन जाईल..

५) हसा!
कितीही वाईट परिस्थीती असो, त्याकडे पाहुन हसा, विनोद बनवा, खळखळुन हसा, मजा घ्या, दुःखाची तीव्रता नाहीशी होईल..!

येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमची उर्जा तुमची शक्ति बनावी, अशा मनःपुर्वक शुभेच्छा..!

Wednesday, October 3, 2018

अष्टभाव

देवी देवता कुठ अंगात येत असतात का काहीही थोथांड असत ते ! अस म्हणणाऱ्यांनी थोडा वेळ काढुन वाचाच .....
संचार अंगात देव देवी येण ही बाब सत्य आहे की असत्य याबाबत समाजात कैक दुमत आहेत अर्थातच त्या बाबतीत अंधश्रद्धा पसरवणारे ही तितकेच कारणीभुत आहेत पण संचार ही एक योगिक क्रिया आहे आणि संचार शक्ती म्हणजे अशी अंश स्वरुप शक्ती जी सर्वसामान्यांच्या आणि विज्ञानाच्या पलिकडे कार्य करते .
संचार भरणे म्हणजे एक प्रकारचे कुंडलिनी शक्तीमधे होणारे कंपन आहे आणि त्या कुंडलीनीच्या जागृती क्रियेत शरीरात होणारे अष्टभाव म्हणजेच संचार प्रक्रिया आहे.
संचार म्हणजे अष्टसात्विक भाव जागृत होणे ..
ज्यावेळी आपण आपल्या आराध्य दैवतेशी एकरूप होतो , आपली भक्ती एक ठरावीक अवस्था प्राप्त करते त्यावेळीअष्ट्सात्विक भाव जागृत होतो .
भक्त किती वर्षे भक्तीमार्ग मध्ये आहे.
त्याच्या जेष्ठतेवरून त्याचा भक्ती मार्गातील - प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत यावरून त्याच्यी अध्यात्मिक प्रगती ओळखली जाते.... ज्या ईष्टदेवतेची तो आराधना करतो किंवा ज्या देवतेवरती त्याची श्रध्दा आहे अशा देवतेच्या उपासनेच्या वेळी त्याच्या अनुभवात आलेल्या क्रिया म्हणजे अष्टभाव ते कोणते तर ....
१】प्रथमभाव-स्वेद :-
मंत्र ,स्तोत्र,जप करताना ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याच्यी सेवा पूर्व जन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.
२】दुसरा भाव-कंप :-
या भावात पोहचवलावर भक्ताला शरीराला कंप सुटतो.शरीरात कंप जाणवते.
३】तिसरा भाव- रोमांच :-
स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेत तिसरा भावात समजवा.
४】चतुर्थ भाव- अश्रू :-
महाराजांचे आठवणीने ह्यूदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेकऱ्याची ह्यूदयाची शुद्धी करतो. अशा सेवेकऱ्याकडून स्वामी काव्य ही निर्माण होते. खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. निदान एकच आसनवर बसून एका तासावर जप करायला हवा.अशी दीड वर्ष साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.
५】पंचम भाव -सत्वापत्ती :-
याभावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. स्वामी मय होऊन जातो. पण सर्व सामान्य माणसे चवथा भावापर्यंत या जन्मात पोहचतात व पुढच्या जन्मात पुढचा अध्यात्मिक प्रवास सुरू होतो.
६】षष्ट भाव-समाप्ती :-
या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख दु:ख मान अपमान निंदा स्तुती सर्व समान वाटु लागतात. अभिमान अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सतगुण वाढू लागतात.
७】सप्तम भाव- असंसक्ती :-
सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांची दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षटचकरे जागरूक होतात-इतरांच्या भूत भविष्य समजत, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरु दुर्लक्ष करतात साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते. व जन कल्याणाचे कार्य करावे.
८】अष्टमभाव-प्रलय :-
या भावात साधक ईश्वराशी एकरुप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात.
काही जण मला प्रश्न विचारतात की 🌿देवी एकाच वेळी एवढ्या सर्वांच्या अंगात येते अस कस शक्य आहे ?
-अहो देवी अंश स्वरुपात संचारीत होते ज्याची जैसी भक्ती त्यास तैसी प्रचिती , सुर्य एकच आहे पण किरण वेगवेगळी आहेत जो त्या किरणांचा सानिध्यात जाईल त्यावर सुर्यप्रकाश पडला अस आपन म्हणतो तस भगवती एक आहे तिचे अंश अनेक आहेत ते एकाच वेळी असंख्यांच्या शरीरात दाखल होऊ शकतात.
मी ईथे आवर्जुन सांगु ईछितो की अंगात देवी देवतांचे संचार भरल्याचे नाटक करुन जगाला ठगविनारे आणि त्याचा गैरफायदा घेणारे पुष्कळ लोक आहेत पण यांच्या या अशा वक्तव्यामुळे काही वास्तविक मुळ तथा प्राकृत संचार असलेल्या व्यक्तींना अनाहत पणे दोष लावणे योग्य नाही.
संचार म्हणजे काय हा सहज बोलण्याचा विषय नाही त्या बाबतीतील सत्य आणि मुळ शोधुन अभ्यास करण्याचा विषय आहे.
भक्तीचे कैक सारे मार्ग आहेत पण मग संचार म्हटल की लगेच सुशिक्षित अज्ञानी लोकांना थोथांड अंधश्रध्दा वाटते पण सर्वांची विचार करण्याची शक्ती एकसारखी नसते काही लोकांची बुध्दी हलकी ही असते. तेव्हा योग्य अभ्यास करुनच आपण काय खर किंवा काय खोट यावर निर्णय घ्यायला हवा.कारण भक्तीचे मार्ग वेगळे असले तरी ध्येय तर मोक्षाचेच आहे. संचार क्रियेत देखिल गुरु शिष्य परंपरा असते गुरुंच्या मार्गदर्शनानुसार संचार शक्तींचे आणि कुंडलिनीचे अनुसंधान करुन व्यक्ती भगवती सेवेत रुजु आहेत.आज कितीतरी उदाहरण आहेत जगात ज्या गोष्टी विज्ञानाला साध्य झाल्या नाहीत त्या या दैवी शक्तींच्या प्रभावाने शक्य झाल्या आहेत. अर्थतच *शंभर वारी (संचार )त्यात चार खरी* हा दृष्टीकोन लक्षात ठेवुनच वागायला हव सुज्ञानांनी...
संचार म्हणजे काय ?तो कसा होतो ? संचारीत व्यक्तीला काय वाटत ? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर एका दमात देणे शक्य नाही त्यासाठी सुरवातीपासुन शेवटाला जायला हव मधेच विचार मांडण्यात काहीच लाभ नाही.
आणि मी हे उपरोक्त मांडलेले विचार माझ्या स्वत:च्या अनुभवातुन आहेत कारण जिथे विज्ञानाचे हात टेकतात तिथुनच त्या भगवती सर्वशक्तीस्वरुपिनी सर्वेश्वरीची सत्ता कार्यरत होते.
माझा कुणाचेही मन दुखवण्याचा हेतु नाही पण डोळ्यावर अंधश्रध्दा अंधश्रद्धा नावाची पट्टी लावुन श्रध्देला ही त्याच दृष्टीने पहनाय्रांसाठी एक छोटा प्रयत्न म्हणुन विचार मांडले.

तुषार (माऊली) जंजीरे
*🚩वंदे सर्वेश्वरी गुरुपरंपराम् 🚩*
*⚜🌹सर्वम सर्वेश्वरी नमो नम:🌹⚜*