Saturday, July 25, 2020

!!! दैवी जीवनाचे १८ नियम !!!

देह सोपवावा प्रारब्धावर।
मन गुतंवावे सद्गुरू चरणावर!!
             
शांत, समाधानी, सद्गुणी, संपन्न, आध्यात्मिक, सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात.

हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे तंतोतंत पालन व्हावे लागते. हे अठरा नियम रक्तात व आचरणात भिनले असता ईश्वरी कृपेचा वर्षाव होतो .

१) सतत श्वाच्छोश्वासांवर लक्ष ठेवावे व मनातल्या मनात परमेश्वराचे नामस्मरण करावे. योग्य वेळ येताच कोणीतरी पुढील मार्ग दाखविणारा भेटतो. ही योग्य वेळ येईपर्यंत सोऽहम् साधना, नामस्मरण, स्तोत्रपठण व एकाग्र चित्ताने करण्याचा प्रयत्न करावा.

२) सतत दान करत राहावे. दानाने संपत्ती वाढते. दानाने पाप फिटते. दानाने शांती समाधान प्राप्त होते. दानाने अध्यात्मात प्रगती होते.

३) प्राप्त परिस्थितीत समाधानात राहण्यास शिकावे. समाधानात राहण्याची कला साध्य झाली असता कठीण परिस्थितीवर मात करता येते.

४) पूर्वजन्मातील कर्मानुसार सुख, दुःख, लाभ, हानी, जय, अपजय, आरोग्य, अनारोग्य, यश, अपयश या गोष्टी प्राप्त होत असतात. दान व ईश्वरभक्ती या दोन गोष्टींनी यातील नकारात्मक गोष्टींवर विजय प्राप्त करता येतो. म्हणजे दु:ख, हानी, अपयश व अनारोग्य इत्यादी गोष्टींवर विजय मिळविता येतो. यासाठी सतत सत्कर्म करत राहावे.

५) स्वत: आनंदात राहावे, इतरांना आनंद देत राहावे, इतरांच्या उपयोगी पडत राहावे. तुमचा प्रत्येक परोपकार ईश्वराकडे नोंद होत असतो व आपल्याला आनंद प्राप्त होत असतो.

६) आहार, निद्रा, भय व मैथुन या गोष्टी प्राणीही करतात. त्यांचेही कुटुंब असते. समूह जीवन असते व त्यांनाही चिंता, काळजी असतात. मनुष्यात व प्राण्यात फरक इतकाच की मनुष्य परोपकार, दान व ईश्वरभक्ती करून परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश प्राप्त करू शकतो. हे भाग्य प्राण्यांना प्राप्त होत नाही. परंतु पूर्वजन्मातील सत्कर्मामुळे जे प्राणी सत्पुरुषांच्या सहवासात राहतात, त्या प्राण्यांना मरणोपरांत मनुष्य जन्म प्राप्त होतो.

७) नि:स्वार्थ असणे, परोपकारी असणे, प्रेमळ असणे हे ईश्वरीकृपेचे लक्षण समजावे.
 
८) सर्व येथे राहणार | काही न येई बरोबर ||
सत्कर्म आणि सदाचार | हेचि जीवाचे सांगाती ||
शाश्वत आणि अशाश्वत गोष्टी समजण्याचा प्रयत्न करावा.

९) एकाच आसनावर स्थिर बसून श्वासावर लक्ष ठेवून दररोज थोडावेळ ध्यान करावे. हळूहळू वेळ वाढवत जावे. तीन तासापर्यंत अशाप्रकारे ईश्वर चिंतन जमले की साधक ही अवस्था प्राप्त होते.

१०) मन निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा. कसलाही विचार न करता बराच वेळ राहता आले, की प्रकाश ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मनात कुठलीही कल्पना अथवा विचार उठू देऊ नये. हे व्यवस्थितरीत्या जमू लागले, की सिद्ध साधक अशी अवस्था प्राप्त होते.

११) खूप खोल व दीर्घ श्वास घ्यावा व सावकाश सोडावा. असे बराच वेळ करत बसावे. असे केल्याने मन निर्विचार होऊ लागते. मन एकाग्र होते व हळूहळू निर्विकल्प समाधी लागू होते जर भाग्य खूपच अपवित्र असेल तर शुद्धिकरणासाठी सद्गुरू सेवा करणे आवश्यक आहे. 
अध्यात्मात प्रगती होऊ देणे व प्रगती होऊ नये म्हणून आपलेच प्रारब्ध अशा प्रकारचे खेळ खेळत असते. प्रारब्धाच्या या प्रकारावर लक्ष ठेवून ह्यावर मात करण्यासाठी सद्गुरू ची नियमित सेवा करावी लागते. तसेच सिद्धपुरुषांच्या कृपेने विहंगम मार्ग प्राप्त होतो व निर्विकल्प समाधी लागते. गुरु अथवा सिद्धपुरुषाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये. जेव्हा शिष्याची तयारी होते तेव्हा गुरु आपोआप भेटत असतो. म्हणून सद्गुणांची कास धरा म्हणजे सिद्धपुरुषांनी कृपा करावी एवढी पात्रता येईल व निर्विकल्प समाधीचा मार्ग सापडेल. पुष्कळ वेळा असेही घडते की एखादा करुणासागर सिद्धपुरुष भक्तांना आपणहून भेटतो. परंतु भक्तांची पूर्वकर्मे जर दूषित असतील किंवा घराण्याचे प्रारब्ध जर खूपच अशुद्ध असेल तर ते अशुद्ध प्रारब्ध सत्पुरुषाची सेवा करू देत नाही किंवा सतपुरुषाबरोबर अहंकाराने वागण्याची दुर्बुद्धी देते व शेकडो जन्मानंतर आलेली संधी भक्त गमावतो. एकदा का अशी संधी गमावली की पुढचे शेकडो जन्म ईश्वराचे फटके खाण्यात जातात.
 
१२) सिद्धपुरुषा बरोबर आत एक व बाहेर एक असे कधीही वागू नये असे वागल्याने वातावरणातील देव-देवता नाराज होतात. देव - देवता अशा भक्तांची साथ सोडून देतात. वातावरणातील दुष्ट शक्ती अशा भक्तांच्या मन, बुद्धीवर ताबा मिळवितात. मग या भक्ताच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की त्याची सर्व पुण्याई नष्ट होऊन जाते. त्याला काहीही चांगले दिसत नाही. सर्वत्र दोष, दुर्गुण त्याला दिसू लागतात. पराकोटीच्या सज्जनां मध्ये सुद्धा त्याला दोष दिसू लागतात. त्यांना नावे ठेवण्यात त्याला आसुरी आनंद प्राप्त होतो. अशी माणसे मग सत्पुरुषांबरोबर व सज्जनांबरोबर आत एक व बाहेर एक अशा पद्धतीने वागू लागतात व खूप कष्टाने मिळवलेली पुण्याई नष्ट करतात. यावरून एक गोष्ट लक्षात येईल, की मनाचा सरळपणा हा एक अत्यंत बहुमूल्य सद्गुण असून, हा सद्गुण ज्याच्याकडे आहे अशी माणसे अत्यंत सात्त्विक व खूप पुण्यवान असतात.

१३) मनुष्य जन्म म्हणजे ईश्वरप्राप्तीचे प्रवेशद्वार असून, या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा मानवाने प्रयत्न करावयास हवा. प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास हवी.
 
१४) सद्गुणांनी मनुष्य देव बनतो. देवाला बाहेर शोधू नका. सद्गुणांची कास धरा आणि सत्कर्म करा देव तुमच्या हृदयात येऊन राहील.

१५) अनुलोम वीलोम प्राणायाम करा, या प्राणायामाने शरीर व मन शुद्ध होण्यास मदत होते. आहार सात्त्विक हलका व पचेल असा असावा. अमली पदार्थांचे सेवन नये. दया, क्षमा, शांती, करुणा, अहिंसा, प्रेम, ईश्वरभक्ती या सद्गुणांनी मानव महामानव बनतो. हे सद्गुण प्राप्त करण्यासाठीच ईश्वराने आत्म्याला मानवाचा जन्म दिलेला असतो.
 
१७) पृथ्वी हे एक विश्वविद्यालय असून मानवता शिकण्यासाठी विविध योनीतील आत्म्यांना ईश्वर मानवरूपामध्ये जन्म देतो व पृथ्वीवर शिकण्यासाठी पाठवितो. येथे जे शिकत नाहीत त्यांना भयंकर शिक्षांना तोंड द्यावे लागते. येथे जे अहंकाराने वागतात, स्वार्थाने वागतात, दुष्टपणा करतात अशा सर्वांना खूप कडक शिक्षा होत असतात.
 
१८) सत्ता, संपत्ती व प्रसिद्धी यांच्या मागे माणसे धावत असतात. परंतु याच गोष्टी अशांती, अस्थिरता व भिती निर्माण करतात. या गोष्टी मानवाला ईश्वरापासून दूर नेतात. माणसाने थोडे दूर रहावे. यांच्या मागून धावून मागून धावणारी माणसे  स्वत:चे इतके नुकसान करतात हजारो वर्षांनंतरसुद्धा हे नुकसान भरून येत नाही. 

वरील अठरा नियमांचे जे लोक श्रद्धेने पालन करतील ते इहलोकी व परलोकी सुखी होतील.

तर हे आहेत ते अठरा नियम. वाचा त्यावर विचार करा. पटले तर स्वीकार करा. जसे मी तुम्हांला सांगितले तसे तुम्ही सुद्धा इतरांना सांगा.

|| शुभं भवतु ||

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ

जिवतीच्या प्रतिमेचे पुजन आणि त्याचा अर्थ
कोण हि जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय?

आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीपपूजन केलं जातं आणि याच दिवशी जरा-जिवंतिका पूजन सुद्धा करतात. 

दिवा हे ज्ञानाचं, वृधिंगतेच प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे दीप. तुम्ही एक दिवा उजळा त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता त्यामुळेच याला वंश वृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन.

दुसरी पूज्य देवता म्हणजे जिवती. 


जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केल्या जातं व आपल्या अपत्यांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे?


जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण मिमांसा...

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट  झाले. हि कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकशिपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात. 

म्हणजेच...
 
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  

त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो. 

म्हणजेच... 

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान. 

नंतर येतात त्या जरा व जिवंतिका -

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट  करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी हि जरा देवी. जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात. 

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पती -

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. 

बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते. 

बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. 

म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं. 

प्रथम रक्षक देवता.

नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. 

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना ...

म्हणजेच जिवती पुजन 

जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

-------

(फेसबुक पेज वरून साभार)

Friday, June 19, 2020

'ग्रीन टाय'

प्रत्येकाने आवर्जुन वाचावी अशी सत्यकथा 👍🏼

'ग्रीन टाय'

"सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येने भारतीय समाज मन अक्षरशः ढवळून निघालं आहे. कलावंत देखील याला अपवाद ठरले नसते तर नवलच. चित्रकार सुनील काळे यांच्या मनात देखील आत्महत्येचे विचार आले होते. पण त्यातून ते बाहेर पडले पण सुशांतसिंहच्या आत्महत्येने त्यांना लिहीतं केलं. आणि १५ जूनच्या सायंकाळी त्यांनी 'चिन्ह'च्या आर्टिस्ट ग्रुपवर सदर लेख पोस्ट केला. तोच लेख त्यांनी त्याचवेळी त्यांच्या फेसबुकवर देखील पोस्ट केला. अपेक्षे पेक्षाही अधिक वाचकांच्या त्या लेखावर प्रतिक्रिया आल्या. काळे सांगत होते त्यांना तर तब्ब्ल ५०-६० फोन आले. म्हणाले, 'अनेक वाचक तर अक्षरशः धाय मोकलून रडतात. काही क्षण सुचेनासं होतं.' म्हटलं हे सारे अनुभव चौराहासाठी लिहून काढा. ते सिद्धहस्त लेखक आहे. ते सारे लिहीतीलच आणि इथं पोस्ट देखील करतील, पण त्या आधी वाचूया त्यांचा मूळ लेख !"

आयुष्य मोठे गमतीशीर असते, किती तरी अकल्पित, नावीन्यपूर्ण, रोमांचक, सुखाच्या, दुःखाच्या घटना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात रोज घडत असतात... आणि विशेष म्हणजे प्रत्येकाचे रोजचे जगणेही वेगवेगळे असते... एकासारखे दुसऱ्याचे जगणे साचेबंद नसते.

अशा या आयुष्यात कधीकधी वाईट प्रसंगाची मालिकाच सुरु होते, आणि चांगला कणखर दिसणारा माणूसही निराशेच्या गर्ततेत खोलवर रुतत जातो. काही माणसं चेहऱ्यावर हुशारीचा आव आणत असतात पण मनातून मात्र कोलमडून एखाद्या वटवृक्षाप्रमाणे उन्मळून पडलेली असतात... असा प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येतोच की खूप झाले जगून, आता नको जगायला यापुढे.... माणसं कबूल करत नाहीत पण आतून त्यांना या प्रसंगाची आठवण धगधग मनात साठलेली असते.

1995 साली मी मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रप्रदर्शन केले होते आणि ते सर्व प्रकारे विशेषतः व्यावसायिक स्तरावर यशस्वी झाले. त्याकाळात मी नालासोपारा येथे राहायचो. माझी नोकरी केमोल्ड कंपनीच्या फ्रेमिंग डिपार्टमेंटमध्ये असल्याने कंपनीच्या लोअर परेल, प्रिन्सेस स्ट्रीट, वसई आणि जहांगीर आर्ट गॅलरी येथे मला रोज जायला लागायचे. सकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत मी थकून भागून घरी परत यायचो. माझं हे रोजचं रुटीन झालं होते त्या रुटीनला आणि त्या भयानक गर्दीच्या रेल्वे प्रवासाला मी मनापासून कंटाळलो होतो. रोज जगण्याऐवजी मी रोज मरत चाललोय ही भावना खूप खोल ठसली होती माझ्या मनात....

मला वाई, पाचगणी, महाबळेश्वर चा निसर्ग खूप आवडायचा म्हणून मी परत कायम मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. पाचगणी मध्ये मला चित्र विक्रीसाठी आर्ट गॅलरी तयार करायची होती या आर्ट गॅलरीच्या ध्येयासाठी मी बेफाम झालो होतो, मी मनापासून प्रयत्न करत होतो. शेवटी सिडने पॉईंटच्या जवळ मला एक जुना बंगला भाड्याने मिळाला त्या जुनाट बंगल्याला आर्ट गॅलरी चे स्वरूप देताना माझे सर्व पैसे कसे संपले हे मलाही कळले नाही तरीही जिद्दीने आम्ही आर्ट गॅलरी सुरू केली अतिशय उत्तम प्रतिसाद सर्व पर्यटकांकडून व स्थानिकांकडून आम्हाला मिळत होता. परंतु एका वर्षाच्या आत घरमालकाने फसवले आणि त्याची जागा परत मागितली मी त्याला अनेक विनंत्या करूनही त्याने नकार दिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यवसायिक रित्या मी पूर्णपणे कोलमडून पडलो. त्यानंतर उतरती कळा लागली ...

मग नव्या जागांसाठी शोध सुरू राहिला पुढे पाचगणी क्लब, टेबल लँड वरची गुहा, मॅप्रो गार्डन अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करत राहिलो. प्रत्येक ठिकाणी नवीन अडचण, नवा प्रयोग, नवे इंटेरियर करावे लागायचे. प्रत्येक वर्षी जागा बदलावी लागायची. त्याकाळात मॅप्रो गार्डन येथे उघड्यावर प्लाझा सारखे प्रदर्शन लावले होते. मे महिन्यात एक दिवस अचानक वळवाचा पाऊस वादळासारखा कोसळला आणि सर्व चित्रे, ग्रीटिंग कार्डस, कॅलेंडर, पोस्टर्स, सर्व काही धो धो पावसात भिजून गेले. मॅप्रोचे कोणीही कामगार मदतीस आले नाहीत, त्यामुळे जवळपास 200 प्रत्यक्ष जागेवर जाऊन काढलेली ओरिजिनल जलरंगातील निसर्ग चित्रे पूर्णपणे बेचिराख झाली. ही ओरिजनल चित्रे पावसामुळे पूर्णपणे धूवून गेली. मॅप्रोच्या मालकांनी कोणतीही मदत केली नाही उलट सर्वच्या सर्व चित्रांचा कचरा ताबडतोब उचलला नाही तर दुसऱ्या दिवशी रस्त्यावर टाकला जाईल अशी धमकी दिली...  आणि पूर्ण देखील केली... आणि जी अवहेलना  केली ती मनाच्या पटलावर एखाद्याने चाकुचे अनेक वार करावे तशी जखम करुन गेली.

अतिशय कष्टाने काढलेली मूळ चित्रे धुळीस मिळाल्यामुळे जगण्याचा आधारच संपला. राहायला घर नाही, जगण्यासाठी पैसे नाहीत, घरातून सकारात्मक प्रतिसाद नाही अशा परिस्थितीत सगळीकडे निराशेच्या अंधाराने मनाला ग्रासून टाकले, मनात काळ्या ढगांची काळीकुट्ट गर्जना सतत येत राहू लागली आणि मग सर्व पसारा आवरून मी मुंबईला गेलो तिथे नालासोपारा येथे माझ्या एकुलत्या एक मुलीचा डॉक्टरांच्या चुकीच्या दिलेल्या इंजेक्शनमूळे मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने मी पूर्णपणे धुळीस मिळालो, पूर्णपणे खचलो.

आणि मग जगण्यात राम नाही, मजा नाही सर्व ठिकाणी निराशाच निराशा पदरी पडल्यामुळे मग जगायच तरी कसे ? कशासाठी ? असे संघर्षमय जीवन किती वर्ष जगायचे ? सततच्या संघर्षाचाच मला खूप कंटाळा आला म्हणून मी मनातल्या मनात आत्महत्या करण्याचे नक्की केले.

पाचगणी क्लबच्या समोरच मुख्य रस्त्याला लागूनच छोट्या रस्त्यावर सेंट पीटरचे चर्च आहे त्या चर्चच्या पाठीमागे अँग्लो इंडियन ख्रिश्चन लोकांची दफनभूमी आहे . येथील परिसर अतिशय शांत आणि निसर्गमय आहे. पाचगणीचा शोध ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने लावला त्या जॉन चेसन याची दफन केलेली दुर्लक्षित समाधी येथे आहे. माहीत नाही पण आत्महत्या करण्यापूर्वी त्या थडग्याचे दर्शन घेऊन आत्महत्या करण्याचे मी नक्की केले होते दुपारी दोनच्या सुमारास मी तेथे पोचलो ज्या माणसाने पाचगणीचा शोध लावला, असंख्य फळाफुलांची, सिल्वर वृक्षांची झाडे लावली ,कॉफी, बटाटे, स्ट्रॉबेरी यांची लागवड केली, या ठिकाणी पहिला बंगला बांधला या परिसराचा संपूर्ण अभ्यास करून हिल स्टेशनला लागणाऱ्या सर्व सुधारणा केल्या, गाईड बुक लिहिले, ब्रिटिशांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या त्या महान जॉन चेसनची दफनभूमी मात्र उघड्यावरच अनेक ऊनपावसाळे झेलत मलूल पडलेली होती. गवतांच्या व काट्याकुट्यां मध्ये कधीही साफसफाई नसल्याने नीट दिसतही नव्हती.

मी थोडी बसण्यासाठी जागा साफ केली व डोळे मिटून जॉन चेसन बरोबर बोलत राहिलो. त्याची व माझी पाचगणीकरांनी केलेली दुर्लक्षित अवस्था सारखीच होती. अचानकपणे डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. या निर्जनस्‍थळी मी पूर्णपणे ध्यानस्थ होऊन एकरूप झालो होतो मला कशाचेही भान राहिले नव्हते कितीतरी वेळ मी तसाच सुन्न बसून होतो आणि... अचानकपणे कोणीतरी खांद्यावर हात ठेवल्याची जाणीव झाली डोळे उघडले आणि पाठीमागे पाहिले तो माझा मित्र आयझॅक सिंग दिसला. आयझॅकने मला कडकडून मिठी मारली माझे डोळे पुसले माझे सांत्वन केले आणि माझी निराशेची पूर्ण कथा मनापासून ऐकली.

आयझॅक पाचगणीत कम्प्युटरचे प्रायव्हेट क्लासेस चालवायचा संगणक व त्याचे शास्त्र याची त्याला खूप माहिती होती. सर्वांना फार प्रेमाने तो शिकवायचा. मी चित्रकार असल्याने कॉम्प्युटरवर चित्र, स्केचिंग काढायला प्रोत्साहन द्यायचा. फुकट शिकवायचा आणि एखादे सुंदर स्केच झाले की खूप कौतुक करायचा. सर्वांना अतिप्रेमाने शिकवत असल्यामुळे अनेक देशी, परदेशी विद्यार्थी त्याच्या क्लासमध्ये आवडीने येत असत. तो सतत बिझी असायचा चालताना देखील धावत धावत चालायचा... आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता.

मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले... आणि मला म्हणाला इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस, पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार... 

तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव, तेथे कोणीही कलाशिक्षक नाही त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची) फार आवश्यकता आहे जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार... 

जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्च मधला येशु तुला कधीही माफ करणार नाही.

फक्त एक महिना तु या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही ....

पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही .. 

मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही, अशी मी विनंती त्याला केली.

आयझॅक जिद्दी होता त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला 
मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर... तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत सकाळचा नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब ...

तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तु का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे. शिवाय तु जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे.

थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे... असे मी ठरवले.

दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो.

प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले.
वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता ती सगळी मुले आणि मुली माझ्या भोवती जमा झाली त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो, जणू मी माझ्या छोट्या स्वतःच्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता...

शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग, नवीन तास, नव्या ओळखी नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोली भोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी. चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर, नॅथलीन मिस, सुनील जोशी सर, असे नवीन मित्रही या बिलीमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना, तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही...

एक शाळेचे नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो ...

हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती... 

आयझॅकने दिलेली ग्रीन टाय. 

अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली.

सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते मुलं देखील नव नवीन गोष्टी शिकत होती त्याच बरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील मी अनेक निसर्ग चित्रे नव्याने रेखाटू लागलो. त्याकाळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर, नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .

माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले नवा स्टुडिओ बांधला.

सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी 80 टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत . पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे .

ती म्हणजे आयझॅक सरांची ग्रीन टाय. 

मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तते मध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो त्याने आता लग्नही केलेले आहे. फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली, बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे ग्रीन  टाय .... कारण ती टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात. काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात, काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात त्यानां मार्ग सापडत नसतो अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात...

ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली, व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची ग्रीन टाय सतत मला आठवण करून देते.

जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी, सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी, सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.

असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक ग्रीन टाय मिळावी किंवा...

तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दुर व्हावा....

म्हणून खूप खूप शुभेच्छा !

तर अशी आहे माझी ग्रीन टाय ची आठवण..... 

मला सतत प्रेरणा देणारी........

सुनील काळे
9423966486