Friday, January 4, 2019

माणुसकीची किंमत


अमेरिकेतल्या एका आडबाजुच्या शहरातील आडबाजुला असलेल्या एका सामान्य हॉटेलात रात्रीच्यावेळी एक वृद्ध जोडपे शिरले. बाहेर मुसळधार पाऊस चालु होता. थंड वादळी वारे वहात होते. प्रचंड थंडी पडली होती. अशा या थंडीत हे वृद्ध जोडपे हॉटेलात शिरले तेव्हा थंडीने त्यांचे अंग थरथरत होते. कपडे पण थोडेसे पावसात भिजलेले होते. तसे त्यांचे कपडे सामान्यच होते. त्यावेळी हॉटेलच्या काऊंटरच्या मागे अगदी सामान्य असा दिसणारा एक निग्रो तरुण बसला होता.

‘आम्हाला आजची रात्र रहाण्यासाठी या हॉटेलात रुम मिळेल का?’ त्या म्हातार्याा आजिबाईंनी थंडीत कुडकुडत त्या निग्रो तरुणाला विचारले.

‘सॉरी मॅम! आज हॉटेल मध्ये सगळ्या रुम्स फुल आहेत. एकही रुम शिल्लक नाही.’ त्या निग्रो तरुणाने सांगीतले पण सांगताना त्याचा चेहेरा असा झाला होता की हॉटेलात एकही रुम शिल्लक नाही हा जणुकाही त्याचा अपराध असावा.

‘बघाना काही जमते का? हवे तर दुप्पट पैसे घ्या. बिल नाही दिलेत तरी चालेल.’ म्हातारबुवा म्हणाले. थोडक्यात त्या रुमचे पैसे त्या निग्रो तरुणाने खुशाल खीशात घालावेत असे ते म्हातारबुवा सुचवत होते. पण तो निग्रो तरुण त्यामुळे काही बधेल असे वाटे ना.

‘हे बघा मी तुम्हाला माझी रुम देऊ शकतो. माझी रुम तशी छोटी आहे पण त्यात तुमची सोय होईल. मला जर 10 मिनिटे वेळ दिलात तर मी माझी रुम जरा आवरून येतो. तोपर्यंत मी तुम्हाला गरमागरम चहा आणुन देतो. त्यामुळे तुम्हाला थोडे बरे वाटेल’. असे म्हणुन तो निग्रो तरुण किचनमध्ये चहा करायला गेला आणि थोड्याच वेळात वाफाळलेल्या चहाचे दोन कप आणि कुकिज घेऊन आला आणि आपली खोली साफ करायला निघुन गेला.

थोड्या वेळात तो निग्रो तरुण परत आला तेव्हा ते म्हातारबुवा आपल्या गाडीच्या डिकितुन एक जाडजुड बॅग काढत असतातना दिसले. ‘थांबा मी तुम्हाला मदत करतो’ असे म्हणुन तो निग्रो तरुण पुढे आला आणि तो बॅग काढुन हॉटेलमध्ये घेऊन आला.

‘चला मी तुम्हाला तुमची रुम दाखवतो’ तो म्हणाला आणि त्या वृद्ध जोडप्याला आपल्या रुमपाशी घेऊन आला.

‘ही घ्या किल्ली! काही लागले तर मला हाक मारा!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘तु कोठे झोपणार?’ त्या आजिबाईंनी विचारले.

‘तुम्ही काळजी करू नका! मी बाहेर हॉलमध्ये झोपेन. माझ्याकडे स्लिपिंग बॅग आहे! गुड नाईट!’ तो निग्रो तरुण म्हणाला.

आजीबाईंनी खोलीचे दार उघडले. खोली तशी लहानशीच होती पण व्यवस्थित आवरून ठेवलेली होती. खोलीचे बाथरुम पण स्वच्छ करून ठेवले होते. खोलीचा हिटर चालु करून ठेवला होता. तसेच पलंगावर दोन इस्त्री केलेले नाईट गाऊन्स ठेवलेले होते. प्यायचे पाणी पण भरुन ठेवले होते.

दुसर्या  दिवशी सकाळी ते वृद्ध जोडपे फ्रेश होऊन बाहेर पडले. आता त्यांना निघायचे होते.

‘किती पैसे झाले?’ त्या आजोबांनी वरचारले

‘पैशांचे आपण नंतर बघु. आधी चांगला ब्रेकफास्ट करा! मी तुमच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन येतो.’ असे सांगुन तो निग्रो तरुण पॅन्ट्रिमध्ये गायब झाला आणि थोड्याच वेळात ऑम्लेट, टोस्ट आणि गरम कॉफी घेऊन आला.

‘किती पैसे द्यायचे?’ त्या म्हातारबुवांनी ब्रेक फास्ट झाल्यावर विचारले.

‘त्याचे असे आहे. मी तुम्हाला माझी खोली वापरायला दिली. ती काही हॉटेलची खोली नव्हती. त्यामुळे त्याचे पैसे काही नाहीत.’ तो निग्रो तरुण म्हणाला.

‘असे कसे? बर मग चहाचे आणि ब्रेकफास्टचे किती पैसे द्यायचे’ त्या आजीबाईंनी विचारले.

‘मॅडम! मला आई वडील नाहीत. माझे आई वडील माझ्या लहानपणीच गेले. तुम्हाला पाहीले आणि मला माझे आई वडील आठवले. आज जर माझे आई वडील या हॉटेलमध्ये आले असते तर मी त्यांच्याकडुन चहाचे आणि नाष्त्याचे पैसे घेतले असते का? नाही ना! मग मला तुमच्याकडुन पैसे नकोत’ तो निग्रो तरुण म्हणाला.

तो निग्रो तरुण काऊंटरजवळ गेला आणि आपल्या खिशातुन काही पैसे काढुन हॉटेलच्या गल्यात टाकु लागला. म्हातारबुवा कुतुहलाने ते बघत होते. त्यांच्या लक्षात आले की त्यांनी जो चहा घेतला होता आणि ब्रेकफास्ट केला होता त्याचे पैसे तो निग्रो तरुण स्वतःच्या खिषातुन हॉटेलच्या गल्यात टाकत होता.

ते वृद्ध जोडपे जायला निघाले. त्या निग्रो तरुणाने त्यांची जड बॅग त्यांच्या गाडीच्या डिकित आणुन ठेवली. तेवढ्यात त्याची नजर गाडीतील रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांकडे गेली. ‘थांबा मी तुम्हाला पाणी आणुन देतो.’ असे म्हणुन त्याने त्या दोन्ही वाटल्या स्चच्छ करून पिण्याच्या पाण्याने भरुन आणून दिल्या. ते वृद्ध जोडपे एकमेकांकडे बघत होते.

‘हे पहा आम्हाला या ठिकाणी जायचे आहे. आम्ही या गावात नवीन आहोत. आम्हाला कसे जायचे हे सांगायला थोडी मदत करणार का?’ आजोबांनी विचारले.

‘थोडे थांबा’ असे म्हणुन तो निग्रो तरुण आत गेला आणि गावाचा नकाशा घेऊनच बाहेर आला. त्याने तो नकाशा आजोबांना देताना म्हणाला ‘आत्ता तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्हाला येथे जायचे आहे. हा बघा हा रस्ता तुम्हाला सरळ तेथे घेऊन जाईल.’ म्हातारबुवांनी बघीतले. त्या निग्रो तरुणाने नकाशावर पेन्सिलने व्यवस्थित खुणा केल्या होत्या.

त्या आजिबाई त्या निग्रो तरुणाचे आभार मागताना म्हणाल्या. ‘तुझे नाव काय? तुझे बिझनेस कार्ड असेल तर मला दे.’

‘सॉरी मॅम! माझ्याकडे बिझनेस कार्ड नाही कारण मी सध्या टेम्पररी नोकरीवर आहे. पण हॉटेलच्या बिझनेस कार्डवर माझे नाव लिहुन देतो. परत या बाजुला आलात तर आमच्या हॉटेलवर जरुर या!’ असे म्हणत त्या निग्रो तरुणाने आपल्या खिशातुन हॉटेलचे बिझनेस कार्ड काढले, त्यावर पेनने आपले नाव लिहीले आणि ते कार्ड आजीबाईंना दिले.

पंधरा दिवस असेच गेले आणि त्या निग्रो तरुणाच्या नावाने एक भला मोठा लिफाफा पोस्टाने आला. तशी त्याला पत्रे वगैरे फारशी येत नसत. हा लिफाफा कोणाचा म्हणुन त्याने उघडुन बघीतला. ओ कॅफे हॉटेलचे लेटर हेड बघुन तो चमकला. ओ कॅफे ही त्याकाळची अमेरिकेतील अत्यंत नावाजलेली अशी हॉटेल्सची साखळी होती. अमेरिकेतील बहुतेक मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये ही हॉटेल्स होती. बहुतेक हॉटेल्स पंचतारांकीत होती. ओ कॅफे हॉटेल्समध्ये काम करायला मिळावे अशी अनेकांची ईच्छा असायची.

ओ कॅफे हॉटेलकडुन कसले पत्र आले आहे हे बघावे म्हणुन तो पत्र वाचु लागला आणि उडालाच. त्याला चक्क इंटरव्ह्युचा कॉल आला होता. त्याच्या शहराजवळच ओ कॅफेचे एक नवीन पंचतारांकीत हॉटेल सुरु झाले होते. तिथे त्याला इंटरव्ह्युला बोलावले होते. पण आपण अर्ज केलेला नसताना आपल्याला इंटरव्ह्युचा कॉल कसा आला याचे त्या आश्चर्यच वाटत होते.

तो इंटरव्ह्युच्या दिवशी त्यातल्या त्यात चांगला पोशाख करुन आणि आपली फाईल घेऊन इंटरव्हुला हजर झाला. या हॉटेलमध्ये आपल्याला वेटरची नोकरी मिळाली तरी पुष्कळ झाले असे त्याला वाटले. त्याने रिसेप्शन काऊंटरवर आपले इन्टरव्ह्युचे लेटर दिले. त्याला सांगण्यात आले की हॉटेलचे चेअरमनसाहेब स्वतः त्याचा इंटरव्ह्यु घेणार आहेत. त्याला आश्चर्यच वाटले. थोड्याच वेळात त्याला हॉटेलच्या सातव्या मजल्यावर असलेल्या चेअरमन साहेबांच्या ऑफीसमध्ये नेण्यात आले. त्यांचे ऑफीस चांगले भव्य होते. थोड्याच वेळात त्याला आत बोलावण्यात आले. तो चेअरमन साहेबांच्या भव्य केबिममध्ये शिरला. त्याने समोर नजर टाकली आणि तो उडालाच.

चेअरमन साहेबांच्या डेस्कच्या मागे तेच वृद्ध जोडपे बसले होते जे त्याच्या हॉटेलमध्ये आले होते.

‘मी जॉन ओ किफे. या माझ्या पत्नि लिलियन ओ किफे. ओ किफे चेन हॉटेल्स आमच्या माककीची आहेत.’ ते आजोबा म्हणाले.

‘त्या दिवशी रात्री तु आम्हाला जी माणुसकीची वागणून दिलीस त्यामुळे आम्ही भारावुन गेलो आहोत. हल्ली अशी माणुसकी बघायला सुद्धा मिळत नाही.’ आजीबाई म्हणाल्या

‘मला तुझ्यासारखी माणुसकीची जाण असणारी माणसेच माझ्या हॉटेलसाठी हवी आहेत. मी या हॉटेलच्या जनरल मॅनेजर पदासाठी तुझा विचार करतो आहे. तु आमच्या हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर म्हणुन जॉईन होशील का?’ ओ किफे साहेब म्हणाले.

‘जनरल मॅनेजर?’ तो निग्रो तरुण चांगलाच उडाला होता, ‘सर! पण मी या पदासाठी लायक आहे का? कारण माझे शिक्षण--- ‘

‘आम्ही तुझी सर्व माहिती काढली आहे.’ ओ किफे साहेब मधेच त्याला थांबवत म्हणाले, ‘घरच्या परिस्थितीमुळे तुला काही फारचे शिक्षण घेता आले नाही हे आम्हाला कळले. तसेच तुझ्या काळ्या रंगामुळे पण तुला कुठे चान्स मिळत नाही हे पण आम्हाला समजते. पण माणुसकी काही शिकवून मिळत नाही. ती उपजतच असावी लागते. आम्ही शरीराचा कलर, जाती, धर्म असा भेद करत नाही. आम्ही माणसातील गुणवत्तेला महत्व देतो. त्या दिवशी रात्री आम्ही तुझी परिक्षा घेत होतो त्यात तु उत्तम मार्काने पास झाला. जेव्हा तु आमच्या चहाचे आणि ब्रेकफास्टचे पैसे तुझ्या खिशातुन हॉटेलच्या गल्यात टाकलेस तेव्हाच आमच्या लक्षात आले की तु नुसताच प्रामाणीक माणुस नाहीस तर ऊत्तम कॅरॅक्टर असलेला माणुस आहेस. आमच्या या हॉटलचा जनरल मॅनेजर म्हणुन तुझे स्वागत असो!’ ओ किफे साहेब म्हणाले आणि त्यांनी त्या निग्रो तरुणाशी शेकहॅन्ड केला.

कधी कधी माणुसकीची आणि कॅरॅक्टरची अशी पण किंमत मिळते.

(एका सत्य घटनेवर आधारीत)

Monday, December 10, 2018

संधी

संधी हि नेहेमीच चालून येत असते, परंतू ती जरी चालून आली तरी ती थांबत नाही, तिला पकडावे लागते. जर पकडण्याचे टायमिंग जुळले तर आपण यशस्वी होतो.

आपल्या जीवनातही अनेक प्रसंग असेच येत राहतात, प्रत्येकाला जीवनात एक संधी मिळतेच ज्यातून काहीतरी नाविन्यपूर्ण, अदभूत, करण्याची ती प्रेरणा असते. फार थोडे लोक अश्या मिळालेल्या संधीचे सोने करतात, व ते मोठे होतात. यशस्वी लोकांना विचारा, ते हेच सांगतील, काळाची गरज ओळखली, थोडा धोकाही पत्करला,  प्रवाह पार करून गेलो व अजून पुढची प्रगती करण्यासाठी नवीन बळ प्राप्त झाले. बहुसंख्य लोक ही संधी सोडतात म्हणून, उर्वरित आयुष्यात हालअपेष्टा सहन करतात. अयशस्वी लोक मात्र संधीला दूषणे देत राहतात, मात्र एकांतात हे मान्य करतात, मी चुकलो त्यामुळे असा राहिलो.

विधात्याने, मी म्हणतो, भिकाऱ्याला सुद्धा अशीच एक संधी दिलेली असते, परंतू ती कोणती व कशी साधायची हे न समजल्यामुळे त्याला या अवस्थेत उर्वरित आयुष्य काढावे लागते. बऱ्याच वेळेस एखादी संधी हुकली तर विधाता अजून  एखादी संधी पण देतोच, पण त्याचाही उपयोग केव्हा व कसा करायचा हे न उमगल्यामुळे उर्वरित जीवनात ससेहोलपट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पृथ्वीराज चौहान पेक्षा मुहम्मद घोरीला मी जास्त श्रेष्ठ मानतो, कारण पृथ्वीराज चौहानला इतके उदार होण्याची गरज न्हवती, पहिल्या वेळेस तो हरला तेव्हाच त्याला संपवला असता तर पुढचे रामायण घडलेच नसते.

होय, हे सर्व करण्यासाठी भाविष्यकाळाचा वेध घेता आला पाहिजे, उद्याच्या जगाला काय हवंय, हे ज्याला आज समजले, तो उद्याचा राजा होणार. धीरूभाई अंबानी, बिल गेट्स (विलियम हेनरी गेट्स), आपला झुकरबर्ग, असे अनेक आहेत. मानवाच्या प्रगतीतील अनेक वळणे जगाला नवीन दिशेला घेऊन गेली.

आदिमानवाने सर्वात प्रथम आगीचा शोध लावला, व जीवन थोडे सुकर झाले, मग चाकाचा शोध लागला, पुढे शस्त्रांचा शोध लावल्यामुळे स्वबचाव, व शिकार ह्या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या. दळणवळण हा विषय अनादिकालापासून मानवासाठी खूप महत्त्वाचा होता व आजही आहे. दोन पायावर चालणे, हि पहिली आणि एकमेव प्रगती शरीरात झाली, उर्वरित जलद प्रवास हा इतर वाहनांच्यामुळे होऊ लागला. घोडा हे वाहन मात्र जवळपास 5000 वर्ष जगात अग्रेसर रहिले, एकोणिसाव्या शतकापर्यंत घोडा हेच प्रमुख वाहन राहिले, ज्याला जेम्स वॉट ने निरूपयोगी ठरवले.

चहा करताना जेम्स ला वाफेचे महत्व समजले, या वाफेचा जेम्स वॉटने कसा उपयोग करायचा हे दाखवून दिल्याने, यांत्रिक युग सुरु झाले, पण त्यालाही काही मर्यादा आल्या, त्यामुळे रेल्वे इंजिनाशिवाय त्याचा फारसा वापर कुठेही झाला नाही. त्याच इंजिनात महत्वाचे फेरबदल करून, रुडॉल्फ डिझेल ने डिझेल इंजिनाचा शोध लावला. या शोधाने जग कोळशातून द्रवरूप इंधनाकडे वळले, जे साठवायला सोपे, कमी जागेत मावू शकले, अश्वशक्ती वाढली, इंजिनाचा आकार छोटा झाला, व वजन कमी झाले. आज दीडशे वर्षानंतरही रुडॉल्फने लावलेल्या इंजिनाच्या शोधात आमूलाग्र बदल झालेला नाही हे विशेष.  या शोधाचे सर्व हक्क ज्याला पेटंट म्हणतो, याची त्या काळात सोय असती व ते त्यांनी त्यावेळी घेतले असते तर आज रुडॉल्फ डिझेल हा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून गणला गेला असता, दुर्दैव याला म्हणतात, हे इंजिन बनवताना आणि विविध प्रयोग करताना, हा जर्मन वैज्ञानिक कर्जबाजारी झाला, व त्याने बोटीतून उडीमारून आत्महत्या केली..... आज आदिवासी सोडले तर डिझेल नावाचे इंधन माहित नसणारा जगात कोणीही नसणार, पण इंधनाला कुणाचे नाव दिले गेले हे मात्र फार थोड्या लोकांना माहित आहे. तात्पर्य काय, शोध लावताना अनेक वेळा यश अपयशाला न घाबरता तोंड देणारा रुडॉल्फ आपला शोध कसा क्रांतिकारक होणार आहे हे पाहण्यासाठी थोडा धीर धरू शकला नाही व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. बरेच लोक असेच काहीतरी नाविन्यपूर्ण करताना, यश जवळ येत असता, धीर सोडतात, व अपयशाच्या खाईत लोटले जातात.

सचिन तेंडुलकर नाही का नर्व्हस नाईन्टीचा कित्तेक वेळा शिकार झाला? शेअर मार्केट मध्ये अनेक लोक असेच घाबरून पैसे घालवतात, आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. संधी व काळाची वाट पहा, आलेली संधी मात्र सोडू नका.

सौजन्य: विजय लिमये, नागपूर (9326040204)

Monday, December 3, 2018

क्षमाशिल कोण?

🙎 आई की मुलं 👫

आईचा वाढदिवस असतो. घरी खूप पाहुणे येणार असतात. त्यांच्या स्वागतासाठी गडबड चालू असते. काचेच्या वस्तूंनी टेबल सजविलेले असते. आईची गडबड पाहून चार-पाच वर्षांचा मुलगा मदत करायचा प्रयत्न करत असतो; पण काम उरकण्याच्या नादात आई मुलाकडे दुर्लक्ष करीत असते. "जा बागेत जाऊन खेळ,'' आई मुलाला सांगते. मुलगा थोड्या वेळाने बागेतून धावत आई..आई करत घरात घुसतो. नेमकी त्याचवेळी आई हातात काचेच्या ग्लासचा ट्रे घेऊन निघालेली असते. मुलगा आईला धडकतो. ट्रे खाली पडून सर्व वस्तू फुटतात. सर्वत्र काचा होतात.

काम वाढले आणि चांगला सेट फुटला म्हणून आई चिडते. मुलाला खूप बोलते. मुलाला आपली चूक कळते, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. हिरमुसून तो खोलीत जातो.

कामाच्या नादात, पाहुण्यांच्या सरबराईत मुलगा खोलीत जाऊन बसला आहे, तेच आई विसरते.

पाहुणे गेल्यावर स्वतःचे ताट वाढून घेताना तिला मुलाची आठवण येते. माझं बाळ जेवलंच नाही म्हणून ती त्याला शोधू लागते. मुलगा खोलीत झोपलेला असतो. रडून रडून अश्रू गालावर सुकलेले असतात. आईला वाईट वाटते, ती त्याला जवळ घेते. मुलगा झोपेतच हातातील फूल तिच्यापुढे करतो आणि पुटपुटतो "हॅपी बर्थ डे ममा!''

गोष्ट वाचली आणि डोळ्यांतून घळाघळा पाणी व्हायला लागलं.

मुलं आपल्यावर किती प्रेम करतात आणि आपण त्यांना नेहमीच किती वाईट बोलतो, हे लक्षात येऊन अपराधी वाटायला लागलं. अनेकदा गोष्ट अगदी क्षुल्लक असते; पण आपण त्याचा बाऊ करतो.

अनेकदा कामे करताना मुले चुका करतात, एखादा निरोप देताना घोळ घालतात; केव्हातरी खोटं बोलतात, त्यांना आवडली म्हणून लोकांची वस्तू उचलून आणतात; अगदी राग आला तर मोठ्यांना उलट मारतातही.

यामध्ये अंतर्यामी हेतू वाईट नसतो; तर त्या त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया असतात. आपल्याला वाटणाऱ्या त्यांच्या वागण्यातल्या चुका असतात. पण खरे तर ते त्यांचे शिकणे असते. आपल्याला त्या चुकांपुरतेच बोलायचे असते, पण आपल्याकडून "वेंधळाच आहेस, आयुष्यात कधी सुधारणार नाहीस, तुझ्यासारखा मूर्ख मुलगा जगात सापडणार नाही; जन्माला आला आहेस तेच मला छळायला,' आदी चुकीची वाक्‍ये जातात.

इतकी वाईट वाक्‍ये ऐकूनही थोड्या वेळातच मूल सर्व काही विसरते आणि आपल्याला येऊन बिलगते. गळ्यात हात टाकते- जसे काही घडलेच नाही.

जर घडलेल्या घटनेवरच शांतपणे आपण मुलाशी बोललो तर पुढे अनेक चुका टळतील. मुले खऱ्या अर्थाने शहाणी होतील.

खरंच विचार करू या, आपण जे वाईट शब्द मुलांना बोलतो ते आपण आपले मित्र, मैत्रिणी, बहीण-भाऊ, नवरा-बायको यांना वापरले तर आपले संबंध कायमचे संपतील, नाही का?

तात्पर्य : आपली मुले आपल्यापेक्षा महान आहेत. कारण ती लहान वयातच आपल्याला क्षमा करायला शिकली आहेत._

ही क्षमाशीलता आपण शिकू या का?