Monday, July 22, 2024

जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!

 जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!


रोजचं आयुष्य आता भरधाव वेगाचं आहे. त्यात पळभर थांबून विश्रांती घेणं, स्वत:शी संवाद साधणं कठीणच. पण ‘सजगतेनं जगण्या’ची संकल्पना अमलात आणायची असेल, तर मात्र हे करावंच लागेल. ते ज्याचंत्यानंच समजूनउमजून करायला हवं. आयुष्याचा ताल आणि तोल सांभाळता यायलाच हवा!


‘सजगतेनं जगणं’ या संकल्पनेत जागरूकतेला मोठं महत्त्व आहे. मग ही जागरूकता आपल्या निर्णयांच्या आणि त्यांच्या परिणामांच्या बाबतीतली असो किंवा आपले विचार आणि कृती या बाबतीतली असो. जागरूकतेनं जगताना आपण निवडलेल्या पर्यायांसह आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेणं अभिप्रेत आहे. सोप्या शब्दात सांगायचं, तर ‘सजगतेनं जगणं’ म्हणजे आपल्या आयुष्याचा वेग कमी करत, आपण कसं जगतोय याकडे अधिक बारकाईनं लक्ष देणं. इंग्रजीमध्ये ‘माइंडफुल’ हा शब्द प्रचलित आहे.


पण हे साध्य करायचं कसं? सगळं जग आपल्याला धावत सुटायला भाग पाडत असतं आणि आपणही कुठल्या ना कुठल्या ध्येयाच्या किंवा गोष्टीच्या मागे अथक धावत असतो. पण या भरधाव गतीमुळे आपण इतके गुंतून पडतो, की त्यातून चिंता, ताणतणाव आणि गुदमरून टाकणारा दबाव यात आपण अडकत जातो.


एकदा गुंतवणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याविषयी वॉरन बफे म्हणाले होते,‘‘केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरण्यासाठी वेळ, शिस्त आणि संयम हे तिन्ही आवश्यक आहेत. कितीही कौशल्याने प्रयत्न केले तरी काही गोष्टींचे परिणाम दिसायला वेळ लागतोच!’’ असाच आणखी एक किस्सा, ‘अॅमेझॉन’च्या जेफ बेझोस यांनी एका मुलाखतीमध्ये वॉरन बफे यांना विचारलं होतं, ‘‘तुमच्या गुंतवणुकीच्या संकल्पना अमलात आणायला अतिशय सोप्या आणि फायदेशीर आहेत. मग सगळे जण त्याप्रमाणे का वागत नाहीत?’’ यावर ते हसून म्हणाले, ‘‘कारण कोणालाही हळूहळू श्रीमंत व्हायचं नाहीये!’’


आपल्या आयुष्यात तरी काय वेगळं घडत असतं? आपलं सगळं लक्ष आपल्याला अपेक्षित असलेले परिणाम झटकन कसे मिळतील याकडे असतं. पण घाईगडबडीत केलेल्या कोणत्याही कृतीचे समाधानकारक आणि दीर्घकाळ टिकणारे परिणाम दिसणं हे तसं अवघडच! एक गोष्ट सांगतो, कुणाल वर्माची.


कुणाल दिल्लीच्या गजबजलेल्या वातावरणात वाढलेला. लहानपणापासून ‘खडतर परिश्रम केल्यानंच यश मिळतं,’ असे संस्कार झालेले. ‘उत्तम, यशस्वी व्यावसायिक जीवन घडवणं हेच अंतिम ध्येय,’ हे आईवडिलांनी मनावर बिंबवलेलं. कुणाल अभ्यासात अतिशय हुशार. आई-वडीलसुद्धा त्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावायचे. त्याच्या ‘बायोडेटा’मध्ये अधिकाधिक चांगल्या गोष्टींची भर पडावी आणि कोणत्याही उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात सहज प्रवेश मिळावा, हा उद्देश. शाळा, शिकवण्या, परीक्षा या सगळ्या चक्रात गुंतून पडल्यामुळे त्याला निवांत विचार करायला वेळच मिळत नसे. अखेर त्याला ‘आय.आय.टी.’मध्ये प्रवेश मिळाला आणि कष्टांचं सार्थक झालं! ‘आय.आय.टी.’मधलं वातावरण अटीतटीच्या स्पर्धेचं होतं. एक लेक्चर झालं की दुसऱ्या लेक्चरला पळणारे, प्रकल्पांवर रात्र-रात्र काम करणारे, सतत कुठल्या ना कुठल्या परीक्षेच्या, इंटर्नशिपच्या तयारीत मग्न असणारे विद्यार्थी, हे एकूण चित्र. कुणालनं स्वत:ला या चक्रात झोकून दिलं. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अभ्यासाच्या व्यापात तो बुडालेला असायचा. उत्कृष्ट मार्क मिळवून गलेलठ्ठ पगाराची, प्रतिष्ठित नोकरी मिळवायची, हा ध्यास. इतकी दमणूक होत असूनही यशस्वी होण्याचा केवळ हाच एकमेव मार्ग आहे, यावर त्याचाही दृढ विश्वास होता. त्या विश्वासावर तो सगळं रेटून नेत होता. पदवीधर झाल्यावर एका मोठ्या, बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली. साहजिकच या नोकरीच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षाही मोठ्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी त्याला वेळही तितकाच द्यावा लागत होता. एकापाठोपाठ एक मीटिंग्ज, न संपणाऱ्या चर्चा, डेडलाईन्स आणि सतत प्रवास यानं आयुष्य व्यापून गेलं. आठवड्याचे सत्तर तास तो काम करत असे. वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणं राहून जात होतं.


एका संध्याकाळी पाऊस पडत होता आणि दिवसभराच्या कामानं दमलेला कुणाल त्याच्या गाडीतून घरी परतत होता. डोक्यात ऑफिसच्या प्रोजेक्टसंबंधी काही विचार सुरू होते. त्याला ते दुसऱ्या दिवशी ‘क्लायंट’समोर मांडायचे होते आणि त्याच्या तयारीसाठी लवकर घरी पोहोचायचं होतं. त्या विचारांत त्याला सिग्नलचा लाल दिवा दिसलाच नाही. चौकात समोरून येणाऱ्या भरधाव गाडीची त्याच्या गाडीला जोरदार धडक बसली. कुणालला जबर मार लागला. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दहा आठवडे तो रोजच्या धकाधकीच्या आयुष्यापासून दूर नुसता पडून होता. पण यामुळे एक झालं, की मनात चाललेला विचारांचा कोलाहल ऐकणं त्याला भाग पडलं. हे त्यानं आजवर कधीच केलं नव्हतं.


हा अपघात कुणालच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. इथून पुढे काहीही झालं तरी इतकं भरधाव वेगानं धावत सुटायचं नाही आणि आयुष्याला इतकं गृहीत धरायचं नाही असा त्यानं निश्चय केला. आयुष्याची गती हळूहळू कमी करत, काही वेळ फक्त स्वत:साठी काढायला त्यानं सुरुवात केली. कामाला मर्यादा घालून घेतल्या. ऑफिसमधलं काम घरी आणायचं नाही, ऑफिसच्या बाहेर पडल्यावर ‘ई-मेल्स’ पाहायचे नाहीत, त्याचबरोबर आपल्या छंदांसाठी आणि आप्तेष्टांसाठी शनिवार-रविवार राखून ठेवायचे, असे काही बदल जाणीवपूर्वक केले. वाचनाचा आणि ड्रम वादनाचा जुना छंद पुन्हा जोपासायला सुरुवात केली. यातून त्याला अतिशय आनंद, निवांतपणा मिळू लागला.


जेव्हा आपल्या डोक्यावर कुठल्या तरी संकटाचा धोंडा कोसळतो, तेव्हाच आपण त्यातून काहीतरी शिकतो. त्याआधी मिळणारे सगळे धोक्याचे संकेत आपण धुडकावून लावतो. जेव्हा छप्परच कोसळतं, तेव्हाच आयुष्यातले सगळ्यात मोलाचे धडे आपण गिरवतो. पण आयुष्य जगायला नव्यानं सुरुवात करण्यासाठी, उत्तम निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी कुठलं तरी संकट यायलाच हवं का?


आपण सगळे सवयीचे गुलाम आहोत. रोज उठून त्याच त्या गोष्टी तोपर्यंत करत राहतो, जोपर्यंत त्यात बदल करायला आपल्याला भाग पाडलं जात नाही! आयुष्य म्हटलं, की बारीकसारीक तक्रारी, अडचणी असायच्याच. त्या स्वीकारत, त्यांच्याशी जुळवून घेत आपण पुढे जात असतो. अचानक आपल्या आयुष्याला एखाद्या संकटामुळे हादरा बसतो. पण खरंतर त्यामुळेच सुखासीनतेतून बाहेर पडून आपण नवीन काही तरी करून बघायला प्रवृत्त होतो. पण जेव्हा आपण सजगतेनं जगायला सुरुवात करू, तेव्हा रोजच्या आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी आपल्याला दिसतील, आठवतील. त्या अमलात आणण्यासाठी कुठलंही संकट येण्याची वाट न बघता आपण त्या प्राधान्यानं करून मोकळे होऊ शकतो! शरीर, मन, भावना आपल्याला वेळोवेळी सूचना देतच असतात. त्यांच्याकडे वेळीच लक्ष दिलं, तर कधी आणि कोणता बदल करणं गरजेचं आहे, हे सहज लक्षात येऊ शकेल.


जीवनाची भरधाव गती नियंत्रणात आणायची असेल, तर शिस्त असायलाच हवी. स्वत:साठी काही वेळ आवर्जून काढण्याची सवय लावून घेतल्यानं प्रचंड वेगानं धावणारं आयुष्य थोडं संथ होतं. सततच्या व्यग्रतेतून काही वेळ बाजूला होऊन, स्वत:च्या शरीराला आणि मनाला भोवतालाशी जुळवून घेण्यासाठी अवकाश मिळतो. मजा अशी, की मोबाइल, लॅपटॉप अशा अनेक अत्याधुनिक यंत्रांच्या गराड्यात आपण सतत असूनही स्वत:साठी मोकळा वेळ काढण्याची आठवण मात्र एकही यंत्र करून देत नाही! केवळ एकाच गोष्टीच्या मदतीनं हा वेळ काढता येऊ शकतो, ती म्हणजे शिस्तबद्धता!


दिवसभर कितीही व्यग्र असलो आणि तरीही त्यातून थोडा वेळ स्वत:साठी काढायचा असेल, तर स्वयंशिस्त गरजेची आहे. काही गोष्टी अवघड असल्या किंवा तुम्हाला आनंद देणाऱ्या नसल्या तरी त्या वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी शिस्त आवश्यक आहे. ऑफिसचं काम घरी न आणणं, मोबाइल, लॅपटॉपसाठी विशिष्ट वेळ निश्चित करणं, ती वेळ झाल्यावर ही उपकरणं बंद करून बाजूला ठेवून देणं, स्वत:ला आनंद देणाऱ्या गोष्टीसाठी आवर्जून वेळ काढणं, हे यात आपसूक आलंच. थोडक्यात काय, तर आपल्या आयुष्याच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करताना नियोजित पद्धतीनं काम करायला हवं, पण त्याचबरोबर स्वत:लाही आवश्यक तेवढी मोकळीक द्यायला हवी आणि ती देता यावी यासाठी शिस्त हवीच.


कुणालच्या बाबतीत शिस्तबद्धतेचा अर्थ रोजच्या व्यग्रतेतून काही वेळ शांतपणे, स्वत:बरोबर घालवणं, त्यासाठी आयुष्याची घडी पुन्हा बसवणं, असा होता. त्यानं रोज सकाळी ध्यान करायला सुरुवात केली. त्यामुळे सुस्पष्ट विचार आणि एकाग्रता, यांसह दिवसाची सुरुवात होऊ लागली. संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर तो फेरफटका मारायला जात असे. या निमित्तानं दिवसभराच्या घडामोडींबद्दल शांतपणे विचार करायला त्याला वेळ मिळू लागला. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन या दोन्हींच्यामध्ये स्वत:साठी हवा असलेला मोकळा वेळ मिळू लागला. शनिवार-रविवार आधी म्हटल्याप्रमाणे स्वत:च्या छंदांसाठी आणि मित्रमंडळींसाठी राखीव ठेवलेले होतेच. यातून आयुष्याचा ताल आणि तोल उत्तम सांभाळला जाऊ लागला.


दैनंदिन जीवनात या चांगल्या सवयींचा समावेश केल्यामुळे कुणालच्या कार्यक्षमतेत वाढ झालीच, पण त्याचबरोबर त्याचं वैयक्तिक आयुष्यही तो अतिशय समाधानानं, तृप्ततेनं जगू लागला. यातून एक मोलाची शिकवण मिळते, ती म्हणजे जेव्हा आपण जीवनाचा वेग नियंत्रित करू, सावकाशपणे एकेक क्षणाची मजा अनुभवू, तेव्हा साहजिकच आपली निर्णयक्षमता सुधारते, अनावश्यक ताणतणाव कमी होतात आणि खोलवर समाधानाचा अनुभव येतो.


थोडक्यात, ‘सजग जीवन’ म्हणजे आतल्या, खऱ्या ‘स्व’ला प्रोत्साहित करणारे, उत्तेजन देणारे पर्याय जाणीवपूर्वक स्वीकारणं. यासाठी जीवनाचा वेग हळूहळू कमी करत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. शिस्तबद्धतेचा अंगीकार केल्यामुळे आणि आत्मचिंतनासाठी काही वेळ काढल्यामुळे आपण अधिक संतुलित आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. त्यासाठी आपल्यावर कुठलं संकट येण्याची आणि त्यामुळे होणारे बदल अपरिहार्यतेनं स्वीकारण्याची मुळीच आवश्यकता नाही!


Loksatta/sanket@sanketpai.com

Ref: https://www.loksatta.com/chaturang/embrace-conscious-living-slow-down-and-find-balance-in-a-fast-paced-world-psg-98-4478267/

जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!

 जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!


‘अजून पाच वर्षांनी/ दहा वर्षांनी तुला स्वत:ला कुठे पाहायला आवडेल?’ असा प्रश्न शाळाकॉलेजच्या वयात, अगदी नोकरीच्या मुलाखतींमध्येही अनेकांना विचारला जातो. त्या वेळी आपण उत्साहानं कदाचित आपल्याला कधीच पेलवणार नाही असं उत्तर दिलेलं आठवत असेल तुम्हाला! आपण ठरवल्याप्रमाणे किती प्रत्यक्षात घडलं?… समजा, आता तुम्ही मध्यमवयीन किंवा प्रौढ असाल आणि तुम्हाला हाच खेळ उलट दिशेनं खेळायला सांगितलं, तर?..


कल्पना करा, की तुम्हाला दहा, वीस किंवा अगदी तीस वर्षांनी लहान असलेल्या तुम्हालाच भेटण्याची संधी मिळालीय! इतर कोणतीही विवंचना नसताना शांतपणे संवाद साधण्यासाठी काही तास… अशा वेळी ‘त्या’ तुमच्याशी तुम्ही काय बोलाल?…


या लेखमालेत आपण ‘सजगपणे जगणे’ या संकल्पनेविषयी बोलतो. त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाचा विचार करून पाहा. केवळ आपण भूतकाळात जाऊन घडलेल्या गोष्टी बदलू शकत नाही, असं कारण सांगून उत्तर द्यायचं टाळू नका. असं समजा, की जणू या प्रश्नावर आपलं सबंध आयुष्य आधारित आहे. आता तुमच्या त्या ‘स्व’ला काय सांगाल तुम्ही? कशी मदत कराल त्याला? कोणता सल्ला द्याल? धाडस करणं, अंगी लवचीकता बाणवणं, आलेल्या चांगल्या संधीचा फायदा करून घेणं, याबद्दल काय सांगाल? मनात करुणा बाळगणं, प्रसंगी स्वत:बद्दलही सहानुभूतीपूर्वक विचार करणं, याचं महत्त्व कसं सांगाल तुम्ही स्वत:ला? आपल्या अस्तित्वाचा अर्थ कसा शोधायचा, ते कसं सांगाल?


ही गोष्ट मी स्वत:च्या बाबतीत करून पाहिली. विशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्या ‘स्व’ला पत्र लिहायचं ठरवलं. गेल्या वीस वर्षांत मी गिरवलेले धडे, गाठीशी बांधलेले अनुभव, चोखाळलेल्या वाटा, प्रसंगी पत्करलेले धोके… सारं काही! हे ते पत्र-


प्रिय, विशीतला मी,


तुला ‘आजच्या मी’कडून खूप खूप प्रेम! मला खात्री आहे, की तू बरा असशील. स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांनी ओतप्रोत अशा तारुण्याच्या उंबरठ्यावर तू उभा आहेस, तेव्हा काही विचार, काही सल्ले द्यावेसे वाटले तुला! साहजिकच मागची अनेक वर्षं मी घेतलेले अनुभव, अनेकदा केलेलं गहन चिंतन, केलेलं धाडस, या सगळ्याचा तो परिपाक आहे. तुला मार्गदर्शन करणं, प्रेरणा देणं आणि जगाकडे, जगातल्या तुझ्या अस्तित्वाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचं आव्हान देणं, हाच यामागचा उद्देश.


अनुभव ‘निर्माण करावे’ लागतात! सरधोपटपणे आयुष्य जगू नकोस. उठल्यापासून झोपेपर्यंत तीच ती कामं करत राहणं म्हणजे आयुष्य नव्हे. खरं तर ज्वलंत अनुभवांनी, साहसांनी भरलेलं असायला हवं आयुष्य. चाकोरीबद्धतेतून, सुखासीनतेतून बाहेर पड आणि झोकून दे स्वत:ला सभोवतालच्या जगात. मग चांगला असो, की वाईट, प्रत्येक अनुभव हा एक रंजक कथा म्हणून तुला सांगावासा वाटेल! नेहमी लक्षात ठेव, की प्रत्येकाची आपली एक कथा असते. तुझी कथाही फक्त तुझी म्हणून अद्वितीय आहे. जगत असलेल्या प्रत्येक क्षणाशी तन्मय हो आणि त्या प्रत्येक क्षणातून तुझं संपन्न व्यक्तिमत्त्व आकाराला येऊ दे.


उत्सुक रहा, मन खुलं ठेव!


जे मर्यादित आणि संकुचित दृष्टिकोन अंगी बाणवत तू मोठा झालास, त्यापेक्षा हे जग फार मोठं, अपार वैविध्यानं भरलेलं आहे. कुटुंबानं किंवा समाजानं आखून दिलेल्या पारंपरिक वाटेवरूनच तू चालायला हवंस असं मुळीच नाही. नवनव्या संकल्पनांचा आणि विचारपद्धतींचा खुल्या मनानं स्वीकार कर. डीन ग्राझीओसी नामक उद्याोजक म्हणतो त्याप्रमाणे ‘जॅकेट अप्रोच’ स्वीकारायचा प्रयत्न करून बघ- म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊन बघ आणि त्यातलं तुझ्यासाठी काय चांगलं आहे ते पहा. सवयीच्या, अंगवळणी पडलेल्या गोष्टींतून बाहेर पडायला अजिबात कचरू नकोस. दोन वर्षांनी जेव्हा तू अमेरिकेत जाशील, तेव्हा तू कधी कल्पनाही केली नसशील इतकी क्षेत्रं, त्यांतल्या उदंड संधी तुला दिसतील. जीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्ती तुला भेटतील. त्या प्रत्येकाचं कार्यक्षेत्र, प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा इतक्या वेगळ्या असतील, की असं काही अस्तित्वात आहे, हे तुझ्या कदाचित गावीही नसेल. त्यामुळे तुझं कुतूहल नेहमी जागं ठेव. अपरिचित वाटांवरूनदेखील प्रवास आत्मविश्वासानं चालू ठेवण्याची प्रेरणा त्यातून तुला मिळत राहील.


निष्कारण घाई नको आयुष्यात निष्कारण घाई-घाई करू नकोस. स्वत:च्या चालीनं चाल. तुझ्या कुटुंबातल्या माणसांची आणि समाजाचीही नेहमी अशी अपेक्षा असेल, की तू यशाच्या मार्गावर भरधाव वेगानं पुढे पुढे जावंस. पण आयुष्य ही काही स्पर्धा नाही! काही लोक तुझ्या पुढे गेलेले दिसतील, तर काही तुझ्या मागे असतील, पण तुझा प्रवास हा तुझ्या एकट्याचा आहे. त्यामुळे तुला हवी ती गती पकड. प्रवासाची मजा घे. वर्तमानाचा आनंद घे. आयुष्यातल्या निरनिराळ्या पैलूंचा शोध घे, प्रत्येक क्षणाचा आस्वाद घे, तोही स्वत:च्या अटींवर! मुक्त श्वास घेण्यासाठी, घडणाऱ्या गोष्टींचा सखोल विचार करण्यासाठी आणि रोज सामोऱ्या येणाऱ्या लहानमोठ्या गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आवर्जून वेळ काढ.


आयुष्यभर शिकत राहण्याचं महत्त्व ओळख!


औपचारिक शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण केवळ त्यावरूनच व्यक्तीची किंमत ठरते असं मुळीच नाही. शिकायला, आधी शिकलेलं विसरून पुन्हा नव्यानं शिकायला नेहमी तयार राहा. पदव्यांवरून स्वत:ची व्याख्या करू नकोस आणि त्यानं स्वत:च्या अहंकाराला खतपाणीही घालू नकोस. उलट नवनव्या संधी निर्माण कर, त्याद्वारे जगात काही भरीव योगदान देण्यावर लक्ष केंद्रित कर. तुला येणाऱ्या अनुभवांमधून आणि पार केलेल्या आव्हानांमधून तू जे शिकशील, ते खरं! आयुष्यभराचा विद्यार्थी हो. नव्या ज्ञानाचा आणि नव्या दृष्टिकोनाचा खुल्या मनानं स्वीकार कर.


ध्येयांच्या बाबतीत लवचीक राहा प्रसंगानुसार तुझी ध्येयं बदलू शकतात आणि ती बदलतीलही. आणि हे अगदीच साहजिक आहे. कदाचित तू आता जे स्वप्न उराशी बाळगतोयस, त्यातून भविष्यात तुला काही समाधान मिळणार नाही. मी असं ध्येय ठरवलं होतं, की आपण एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करायची! त्या स्वप्नानं मी पुरी बावीस वर्षं झपाटलो होतो. पण भविष्यात माझ्या असं लक्षात आलं, की मी खरा कशात रमतो, तर सुमार दर्जात समाधान मानण्याच्या मानसिकतेतून लोकांना बाहेर काढण्यात… त्यांना चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करायला प्रवृत्त करण्यात! स्वप्नं आणि ध्येयं तुमच्याबरोबर प्रगल्भ होत जातात. तेव्हा जीवनाबद्दलची दूरदृष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न कर. सुरुवातीला ही दृष्टी खूप विस्तारित, ढोबळ स्वरूपाची असेल. पण हळूहळू ती नेमकी होत जाईल. मग कोणत्याही चाकोरीत न अडकता तू नवनव्या गोष्टी आत्मसात करत जाशील, तुझा परीघ विस्तारेल.


योग्य मार्गदर्शक शोध! सुरुवातीपासूनच तू तुला मार्गदर्शन करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या, तुझ्या क्षमतांना आव्हान देणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात राहा. त्यांना जगातलं सर्व काही माहीत असलं पाहिजे असं मुळीच नाही, पण जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंच्या बाबतीत त्यांनी तुझ्यापेक्षा अधिक प्रगती केलेली असावी. वेगवेगळ्या विचारसरणीचे मार्गदर्शक हवेत. त्यामुळे तुझ्या विचारांच्या कक्षा रुंदावतील, नव्या शक्यताही निर्माण होतील. जसजसा तू मोठा होशील, तसे तुझे मार्गदर्शकही बदलतील. तुझा पुढे पुढे प्रवास सुरू आहे, याचंच हे द्याोतक आहे.


नात्यांची बाग फुलव आयुष्य काही एकट्यानं जगण्यासाठी नाहीये. अर्थपूर्ण नाती निर्माण कर आणि ती जप. नात्यात व्यवहार नसतो. निखळ आनंदाचा आणि सुदृढ आयुष्याचा पाया म्हणजे नातं. लहानशा रोपट्याचं सावली देणाऱ्या घनदाट वृक्षात रूपांतर होण्यासाठी तू जशी मेहनत घेशील, तशीच मेहनत नात्यांची जोपासना करण्यावर घे. तत्काळ हवं ते देणाऱ्या गोष्टींचा मोह टाळून नेहमी प्रदीर्घ काळासाठीच्या नात्यांना प्राधान्य दे. तुझ्या जवळची माणसं तुला आधार देतील, आनंद आणि मार्गदर्शन देतील. ती तुझं जीवन अधिक संपन्न आणि अर्थपूर्ण व्हायला मदत करतील.


हाती आलेली संधी घ्यायला शीक! अपयशाचा किंवा अन्य कशाचा शिक्का आपल्यावर बसेल या भीतीनं कधी मागे हटू नकोस. अनेकदा अपरिचित गोष्टी करून पाहण्याचं धाडस दाखवल्यानं आपल्याला भरघोस काहीतरी मिळून जातं. मग ते स्वप्नांचा पाठपुरावा करणं असो, पूर्वी आपण जिथे गेलो नाही अशा परदेशात प्रवास करणं असो किंवा संपूर्णपणे नवीन काही तरी करणं… अनुभव नेहमी तुला समृद्ध करतील, तुझा आत्मविश्वास वाढवतील. अनिश्चिततेचा स्वीकार करत जागरूकतेनं, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जोखीम पत्करण्याची तयारी ठेव. तुला असं आढळेल, की ज्या क्षणी आपल्याला सर्वांत जास्त असुरक्षित वाटत असतं, अशा क्षणातूनच आपण खूप शिकत असतो, विकसितही होत असतो.


बदलांचा स्वीकार कर!


आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. पण बदल हाच जीवनाचा स्थायिभाव! त्यामुळे बदलाला विरोध करण्यापेक्षा त्याचा स्वीकार कर, त्याची मजा घे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर नव्या संधी, नवी आव्हानं उभी असतात. बदलाचा सहर्ष स्वीकार केल्यानं पूर्वी आलेल्या अपयशातून विकासाच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. अपेक्षित किंवा अनपेक्षित, कोणत्याही बदलामध्ये नव्या शक्यतांचं बीज दडलेलं असतं हे लक्षात ठेव.


आत्मचिंतनाला प्राधान्य दे!


तुला आलेल्या अनुभवांचा बारकाईनं, सखोल विचार कर. त्यातून शीक आणि भविष्यासाठी नवी ध्येयं ठरव. स्वत:चा विकास हा एक निरंतर प्रवास आहे. त्यातून अधिकाधिक प्रगल्भ होत जाणं, दिवसागणिक आपलं व्यक्तिमत्त्व आणखी विकसित करण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं! तुझी बलस्थानं, उणिवा आणि महत्त्वाकांक्षा नीट समजून घे. स्वत:बद्दलची जागरूकता हा तुझ्या निरंतर होणाऱ्या विकासाचा पाया असेल.


पुढच्या प्रवासाला तू खुल्या मनानं, साहसी वृत्तीनं सुरुवात करावीस यासाठी तुला उद्याुक्त करणं हेच इथे माझं काम होतं! जगात असंख्य शक्यता, असंख्य संधी आहेत. तसंच तुझं जीवनही त्यातल्या अनपेक्षित कंगोऱ्यांसह अद्वितीय सुंदर असो! जे समोर येईल त्या साऱ्याचा स्वीकार कर. तुला वाटतं त्यापेक्षा तू खूप जास्त खंबीर, जास्त सक्षम आहेस!


तुझ्यातल्या ‘लढवय्या’साठी…


तुझ्या भविष्यातला ‘मी’!


हे तर झालं मी मला लिहिलेलं पत्र! आता तुमची पाळी. सांगा… तुम्हाला तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या ‘स्व’ला पत्र लिहायची संधी मिळाली, तर काय लिहाल?…


Loksatta/sanket@sanketpai.com

Ref: https://www.loksatta.com/chaturang/loksatta-chaturang-letter-dialogue-live-concept-point-of-view-amy-95-4451431/

Monday, December 19, 2022

उपयोगी मंत्र

उपयोगी मंत्र

ज्यांनी कोणीही हे मंत्र संकलन केले असेल त्यांचे आपल्या सर्वांकडून आभार! 🙏

(1) *अन्नाचा दृष्टी दोष घालवण्याचा मंत्र* (एकदाच म्हणावा)

अन्नं ब्रम्ह रसो विष्णूर्भोक्ता देवो महेश्वराः।

इति संचित्यं भुंजानं दृष्टी दोषो न बाधते।।

(2) *जेवणास सुरूवात करण्या आधी म्हणावयाचा मंत्र* —

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे।

ज्ञान वैराग्य सिदध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती।।

(3) *जेवणापुर्वी म्हणण्याचा असाच एक गीतेतील श्लोक* —

ब्रम्हार्पणं ब्रम्ह हविः ब्रम्हाग्नौ ब्रम्हणाहुतम्‌।

ब्रम्हैव तेन गंतव्य ब्रम्ह कर्म समाधिना।। 

(4) *नेत्र विकार होऊ नयेत म्हणून जेवण झाल्यावरचा मंत्र* — 

स्वर्यातिंच सुकन्यांच च्यवनं शक्रमश्विनौ।

भोजनान्ते स्मरेद यस्तु तस्य चक्षुर्न हीयते।।

(हात धुतल्यावर ओल्या हाताने दोन्ही डोळ्यांवर अल्प घर्षण करून पाणी लावावे, नेत्र चांगले राहतात)

(5) *भोजन झाल्यावर योग्य रितीने अन्न पचन व्हावे म्हणून जेवणानंतर मंत्र म्हणत पोटावरून हात फिरवावा.*

अगस्त्यं कुंभकर्णं च शनिं च वडवानलं।

आहार प्रति पाकार्थम्‌ स्मरामि च वृकोदरम्‌।।

अतापि भक्षितो येन वातापीच महाबलः।

अगस्तस्य प्रसादेन भोजनं मम जीर्यताम्‌।।

(श्रद्धा हवी तर या मंत्रांचा अनुभव येतो)

(6) *लहान मुलांना नजर, दृष्ट लागते त्यावर मंत्र*— 

अंजनी गर्भ संभूतं कुमारं ब्रम्हचारिणम्‌।

दृष्टी दोष विनाशाय हुनुमंतं स्मराम्यहम्‌।।

(7) *गाढ निद्रा येण्यासाठी, झोपताना खालील मंत्र म्हणावा* — 

अगस्तीर्माधवश्चैव मुचकुन्दो महाबलः।

कपिलो मुनि रास्तिकः पंचैते सुख शायिनः।

(8) *वाईट स्वप्ने पडू नयेत या साठीचा मंत्र —* 

(झोपण्या अगोदर म्हणावा)

अच्युतं केशवं विष्णुं हरि सोम जनार्दनम्‌।

हंसं नारायणं कृष्णं जपेत्‌ दुःस्वप्न शान्तये।।

(09) *घराबाहेर पडल्यानंतर, घरी परत येईपर्यंत रक्षण व्हावे यासाठी मंत्र —* 

वनमाली गदी शारंगी शंखी चक्रीय नन्दको।

श्रीमान्‌ नारायणो विष्णूर्वासुदेवो भिरक्षतु।।

(ह्यातील मंत्र नंबर -५ चा अनुभव बऱ्याच जणांनी घेतला आहे काही वर्षांपूर्वी. जास्त जेवल्यावर जर पोट दुखत असेल तर तो मंत्र पोटावरुन हात फिरवत किमान ५ वेळा म्हणावा म्हणजे पचन नीट होते, गॅस निघून जातो.)