Thursday, September 27, 2018

ड्रिम लाईफ


  काही लोक आयुष्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण एंजॉय करतात,तर काही लोकांना आयुष्य यातनामय, वेदनादायी, शापासारखं वाटु लागतं?

आपल्याला सुखी व्हायचं असतं, म्हणजे नेमकं काय बरं हवं असतं? आपल्याला प्रामुख्याने चार गोष्टी हव्या असतात, पैसा, आरोग्य, आजुबाजुला सतत प्रेम करणारी माणसं आणि सदा आनंदी, प्रफुल्लीत, प्रसन्न मन!..
बस!, ह्या चार गोष्टी आयुष्यात मनसोक्त मिळवणं, हीच आपली ‘ड्रिम लाईफ’.

अमेरीकेत एक माणुस आहे, मागच्या चौपन्न वर्षांपासुन, तो लोकांना, आपल्या स्वप्नातली लाईफ प्रत्यक्षात कशी आणायची, याचे धडे देतो. आपल्या पुस्तकांसाठी आणि व्याख्यानांसाठी तो जगप्रसिद्ध आहे, ‘ब्रायन ट्रेसी’ त्याचं नाव!... त्याने सांगीतलेल्या टिप्स जीवनात वापरल्यामुळे, आतापर्यंत लाखो लोकांच्या जीवन सुखी आणि आनंदी झालयं. ‘ड्रिम लाईफ’ प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याने दिलेल्या सात टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

१) भविष्याचा वेध घ्या – कोणतेही स्वप्न पुर्ण करण्यासाठी पहीली पायरी कोणती असते? प्लान बनवणे, मोठ्ठे निर्णय घेणं, किंवा चांगली टीम बांधणं, ही ती पहीली पायरी नसते, तर सर्वात पहीली पायरी असते, ती म्हणजे स्वप्ने डोळ्यासमोर आणणे.
मोठ्ठी स्वप्ने पहायला खरचं हिंमत लागते, हे खुप सोपं असुनही खुप कमी लोकं करतात,
आठवुन बघा, तुम्ही अनुभवलं असेल, तुमचं एखादं भव्य-दिव्य स्वप्न असेल, आणि एखाद्या साधारण कुवतीच्या माणसाला ते सांगीतलं, तर तो आपल्या बोलण्याला हसण्यावरी नेतो. कारण त्यांची स्वप्नं पाहण्याची क्षमताही मर्यादीत असते, आणि ही मर्यादाच त्यांचा मुख्य शत्रु असते.
ब्रायन ट्रेसी म्हणतात, स्वप्ने पहा, शक्य तितके मोठे स्वप्न पहा, त्यासाठी त्यांनी सांगीतलेली टेक्निक म्हणजे, भविष्याचा वेध घ्या, तुमचं आजपासुन पाच वर्ष पुढचं आयुष्य कसं असेल त्याची कल्पना करा. तुमच्या ‘परफेक्ट लाईफ’चं चित्र बारीकसारीक गोष्टींसह रंगवा, तेव्हा तुम्ही कसे असाल, कसे दिसाल, तुमचं उत्पन्न, संपत्ती किती असेल?, तुमचं आरोग्य, तुमची लाईफस्टाईल कशी असेल? याची उत्तरं स्वतःला विचारा. पैसा, आरोग्य, प्रेमळ नातेसंबंध आणि आत्मिक समाधान यांच्याबाबत जितक्या चांगल्या, आकर्षक कल्पना तुम्ही रंगवाल, तितकी लवकर तुमची स्वप्ने पुर्ण होणार आहेत. 

२) मी करतो, म्हणा – ‘जादव मोलाई पयांग’, हा मुलगा सोळा वर्षांचा असताना, १९८३ मध्ये त्याच्या राज्यात, आसाममध्ये भयंकर महाप्रचंड असा पुर आला होता, मोलाईच्या डोळ्यासमोर, भलमोठं, जंगल वाहुन गेलं होतं आणि फक्त दलदल असलेली, ओसाड जमीन शिल्लक राहीली होती, झाडं आणि हिरवळ नसल्यामुळे, वेगवेगळे पक्षी, वेगवेगळे प्राणी अचानक गायब झाले होते, मोलाईने सभोवतालच्या लोकांना सांगीतलं, आपण पुन्हा इथे झाडं लावुया, नाहीतर एके दिवशी आपणही असेच गायब होवु, तेव्हा लोक त्याच्यावर हसले, त्याने वनविभागाला झाडे लावण्यासंबंधी पाठपुरावा केला, त्याच्या तगाद्याला कंटाळुन, वनविभागाने त्याला उलट सुचवलं की तुम्ही स्वतःच हे काम केलं तर आमची हरकत नाही, आणि ते उत्तर ऐकुन मोलाई स्वस्थ बसला नाही,
सोळा वर्षांचा मोलाई, हातामध्ये कुदळ, फावडी घेऊन एकटाच निघाला, झाडे लावायला, आणि कित्येक वर्ष, त्या दलदलीत न थकता, अविरत तो झाड लावत राहीला, गेली तीस वर्ष त्याचा हा उद्योग सुरु होता, आतापर्यंत दोनशे हेक्टर म्हणजे तब्बल तेराशे पन्नास एकर परीसरावर झाडे लावण्यात तो यशस्वी झालाय. त्याने लावलेल्या झाडांचं आता अभयारण्य झालयं, शेकडो प्रकारचे प्राणी, जसं की बंगाल टायगर, म्हणजे वाघ, फक्त भारतात आढळणारे अतिदुर्मिळ गेंडे, विविध प्रकारची हरणं, चितळ, हत्ती, ससे आज तिथे आनंदाने जगतात. फक्त एका माणसाच्या दृढनिश्चयाने आणि कृतीने काय होवु शकतं, ह्याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या जंगलला शासनानं मोलाईचं जंगल असं नाव देऊन त्याचा गौरव केलाय.
मोलाईने कोणालाही दोष दिला नाही, त्याने कुदळ उचलली आणि कामाला लागला, आपल्या आयुष्यातल्या अडचणींसाठी आपण कुणाला न कुणाला दोष देतो, सरकार, नातेवाईक, भागीदार, परिस्थिती यांना दोष देवुन आपण स्वतःची सुटका करुन घेतो, आणि ही वृत्तीच आपला घात करते.

३) थोडं अधिक (फोर्टी प्लस फॉर्मुला) – इतरांपेक्षा थोडं अधिक आयुष्य हवं असेल तर इतरांपेक्षा थोडे अधिक कष्ट करावेच लागतात. बहुतांश लोकांच्या आयुष्यात एक सुरक्षित त्रिकोण असतो, आठ त्रिक चोवीस, म्हणजे आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास झोप,….मज्जानि लाईफ….
सामान्य लोकं, आठवड्यातले, चाळीस तास काम करतात, तर ध्येयासाठी झपाटलेले लोकं, आयुष्याची काही वर्षं, आठवड्यातुन सत्तर-ऐंशी, गरज पडल्यास एकशे दहा तास देखील काम करतात, म्हणजे सुट्टी न घेता, रोज बारा-चौदा तास काम.

आणि हेच लोक, रोटी, कपड्याच्या चक्रव्ह्युवातुन लवकर बाहेर पडतात, भरघोस उत्पनाचे स्त्रोत उभे करुन लवकर सेट होतात, पुढे आयुष्याचा खरा आनंद अनुभवतात, अगदी काही महीने सुट्टी घेवुन जगभर भटकंती करायचं स्वातंत्र्यदेखील मिळवतात.

जर का संपुर्ण आयुष्य, मनाजोगती धमाल करण्यात घालवायचं असेल तर काही वर्ष कष्ट करायची तयारी ठेवायलाच हवी.

४) आयुष्यभर शिकत रहा – सामान्य लोकांचं शिक्षण हे कॉलेजमधुन बाहेर पडल्यावर संपतं, आणि ते एक चाकोरीबद्ध आयुष्य जगत राहतात, तर यशस्वी लोकांना माहीत असतं की खरं शिक्षण कॉलेज संपल्यावर सुरु होतं, ते सतत काहीनाकाही नवीन शिकत राहतात, यांना शिकण्यासाठी आयुष्य कमी पडतं. आजच्या वेगाने बदलणार्‍या जगात, सतत नवनवीन शिक्षण आवश्यक झालयं.

दोनशे वर्षापुर्वी, ज्याच्याकडे जमीने जास्त तो जास्त श्रीमंत मानला जायचा, शंभर वर्षापुर्वी औद्योगिक क्रांती झाली, ज्याच्याकडे कारखाने आणि कामगार जास्त त्याला श्रीमंत मानलं जाऊ लागलं, आता माहीतीचं युग आहे, ज्याच्याकडे जास्त, नॉलेज आहे, त्यालाच आज किंमत आहे.
म्हणुनच श्रीमंत लोक सतत काहीनाकाही वाचत असतात, ऐकत असतात, व्हिडीओ पाहतात, ज्यामुळे योग्य वेळी योग्य संधी आल्यास तीचं सोनं करता येईल.

म्हणुन लेखकाचा आग्रह आहे, रोज कमीत कमी अर्धा ते एक तास काहीतरी नवीन शिकण्यात व्यतित करा.

५) प्रामाणिकपणाची शक्ती – समजा, तुमचे दोन मित्र आहेत, एक सच्चा, एक लुच्चा…तुम्हाला कोणासोबत वेळ घालवायला आवडेल? खोटं बोलणारी, खोटं वागणारी लोकं कोणालाचं आवडत नाहीत, मैत्रीत अशा लोकांना स्थान नाही, तर व्यवहारात कसं असेल? ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो, लोकांना अशाच लोकांसोबत व्यवहार करायला आवडते. त्याच्याकडुनच वस्तु किंवा सेवा खरेदी केली जाते. प्रामाणिक माणुस मग तो कोणत्याही वयाचा, जातीचा किंवा धर्माचा असला तरी त्याच्याकडेच ग्राहकांची रीघ असते.

सोप्या शब्दात, लेखक सांगतो, की तुमचं यश केवढं? तर इतर लोक तुमच्यावर जेवढा भरवसा ठेवतात, तेवढं!...
भरवसा टिकवण्याचा एकच उपाय आहे, नेहमी खरे बोलणे, कितीही बिकट प्रसंग असु दे, खोटे बोलायचे नाही. खरे बोलण्याने, लोक सन्मान देतात, सोबत काम करण्याच्या संधी देतात.

६) वेग वाढवा – अमेझॉनने एक रिसर्च केला, एका सेकंदाने जर त्यांची वेबसाईट स्लो झाली तर त्यांना वर्षाला दिड अरब डॉलरचं नुकसान होवु शकतं, गुगल जर पाव सेकंद स्लो झालं तरी ते वर्षाला ऐंशी लाख ग्राहक गमावेल. ह्या दोन उदाहरणांवरुन लक्षात येतं की आज आपण किती फास्ट जगात राहतोय.
एकविसाव्या नव्या शतकाचं नवं चलन आहे, ते म्हणजे वेळ. म्हणुन स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेची कदर करायला हवी. टंगळमंगळ करणार्‍या लोकांना वेळेची किंमत कळत नाही. जे वेळेला महत्व देत नाहीत, त्यांना जग महत्व देत नाही.
कोणतही काम, एकाग्र होवुन, जलदगतीने करण्याचा सराव असणारे लोक, समाजात, जास्त लोकप्रिय असतात.

७) चांगली संगत – जीवनातला पंच्याऐंशी टक्के आनंद हा त्या लोकांमूळे किंवा मित्रांमुळे मिळतो, ज्या लोकांना तुम्ही घरात किंवा कामाच्या ठिकाणी, भेटता, मनमुराद हसता, मनातलं हितगुज करता, यातुन एक उर्जा मिळते, आयुष्यात, जितके जास्त असे प्रेमाचे, नातेसंबंध असतील, तुमची प्रगती तितकी जास्त होते.
कुठल्याही व्यवसाय मैत्रीपुर्ण संबध बनवल्यानेच भरभराटीला येतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही अशा व्यक्ती नेहमी भेटतील, ज्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी तयार असतील, लेखक सांगतो, अशा व्यक्तींसोबत मैत्री करा. भविष्यात त्यांची तुम्हाला नक्की मदत होईल.
आनंदी जीवन जगण्याचा अजुन एक उपाय म्हणजे “मागु नका, द्या!” प्रत्येक ठिकाणी, स्वतःचा फायदा बघण्यापेक्षा, मी दुसर्‍याच्या कामी कसा येवु शकतो?, असा विचार केल्याने आपोआप समृद्धीची गुफा, आपल्यासाठी दार उघडते. 

ह्या सात मार्गांचा वापर करुन ब्रायन ट्रेसीने सुशिक्षीत बेरोजगार ते अब्जाधीश असा थक्क करणारा प्रवास केला. असाच प्रवास तुमच्याही वाट्याला येवो, अशा ट्रक भरुन शुभेच्छा!..

(थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन)

लेख आवडल्यास मनमोकळेपणाने कमेंट करा, आपल्या मित्रांचे भले होईल असे वाटल्यास शेअर करा. तुमचा प्रत्येक लाईक मला अजुन छान छान लेख लिहायला प्रोत्साहन देतो.

No comments:

Post a Comment